विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कधीकधी सर्वात मोठा उजेड तिथूनच बाहेर पडतो, जिथे अंधारानं सर्वात जास्त मुक्काम केलेला असतो,” या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून झारखंडमधील गुमला जिल्ह्याचा उल्लेख करत एक प्रेरणादायी प्रवास उलगडला. माओवादी हिंसाचाराने ग्रस्त असलेला गुमला आज विकासाच्या दिशेने झेपावत आहे, आणि यामागे आहे ओमप्रकाश साहू या तरुणाचा धैर्यशील प्रवास त्यांनी सांगितला. ( Moving from Maoist darkness to the light of the fish revolution Inspiring story told by the Prime Minister in Mann Ki Baat)
गेल्या काही दशकांपूर्वी बासिया गटातील गावांमध्ये माओवादी दहशतीमुळे लोक गावं सोडून जात होते. रोजगाराच्या संधी नव्हत्या, जमिनी पडिक होत्या आणि तरुण वर्ग गाव सोडून पळून जात होता. मात्र, अशा कठीण काळात ओमप्रकाश साहू यांनी बंदुकांचा मार्ग सोडून मत्स्यपालनाची दिशा निवडली आणि या निर्णयाने क्रांतिकारी बदलाला सुरुवात झाली.
ओमप्रकाश यांना सुरुवातीला विरोध आणि धमक्याही सहन कराव्या लागल्या. पण त्यांनी हिंमत न हरता प्रयत्न सुरू ठेवले. ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’ अंतर्गत सरकारकडून मिळालेल्या प्रशिक्षणामुळे आणि तलाव बांधण्यासाठी मिळालेल्या साहाय्यामुळे त्यांच्या कामाला गती मिळाली. त्यांनी इतर युवकांनाही मत्स्यपालनाकडे वळण्यासाठी प्रेरित केले.
ओमप्रकाश साहू यांची सुरुवात सोपी नव्हती. विरोध झाला, धमक्या मिळाल्या, पण हिंमत हरली नाही. ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’ आल्यावर तर त्यांना नवं बळ मिळालं. सरकारकडून प्रशिक्षण मिळालं, तलाव बांधण्यासाठी मदत मिळाली आणि बघता-बघता गुमलामध्ये मत्स्यक्रांतीचे वारे वाहू लागले. आज बासिया गटामधली 150 हून अधिक कुटुंबं मत्स्यपालनात सामील झाली आहेत. असे अनेक लोक आहेत जे एकेकाळी नक्षलवादी संघटनेत होते, आता ते गावात सन्मानानं जगत आहेत आणि इतरांना रोजगार देत आहेत. गुमलाचा हा प्रवास आपल्याला हेच शिकवतो – जर मार्ग योग्य असेल आणि मनात विश्वास असेल तर अत्यंत कठीण परिस्थितीतही विकासाचा दिवा पेटवता येतो, असे पंतप्रधान म्हणाले.
