लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी कसाबची बाजू घेतली, खासदार उज्ज्वल निकम यांचा घणाघात

विशेष प्रतिनिधी

मुंबई : “मी अफझल गुरुला आणि कसाबला फाशी दिली, पण लोकसभा निवडणुकीत काही दळभद्री विरोधकांनी याच कसाबची बाजू घेतली,” असा घणाघात भाजपा खासदार आणि ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला. ( Opposition takes Kasabs side in Lok Sabha electionsMP Ujjwal Nikam lashes out)

राज्यसभेवर निवडून आल्यानंतर मुंबईत आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय प्रवासापासून ते न्यायप्रक्रियेतील तत्त्वांपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार टीका केली.

निकम म्हणाले, “26/11 च्या मुंबई हल्ल्यातील कसाबला मी फाशी दिली. त्याच्याबद्दल पाकिस्तानने कधीच कुठेही बोलले नाही. पण लोकसभा निवडणुकीत काही विरोधकांनी प्रचारात असं सांगितलं की कसाबच्या गोळीने हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामठे यांचा मृत्यू झाला नाही, तर आरएसएसच्या एका इन्स्पेक्टरनेच त्यांना मारलं. आणि या कथित खोट्या माहितीत उज्ज्वल निकम सहभागी असल्याचा आरोप एका मोठ्या काँग्रेस नेत्याने केला. मला ‘देशद्रोही’ ठरवलं गेलं.”

“या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी दु:खद होत्या. मी केवळ देशासाठी काम करत होतो. पण निवडणूक प्रचारात राष्ट्रहिताच्या बाबतीतही खालच्या पातळीवरची वक्तव्ये करण्यात आली,” असा आरोप करत निकम यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

निकम म्हणाले, “माझं राजकारणात येण्याचं अजिबात स्वप्न नव्हतं. पण देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या आग्रहामुळे मी भाजपचा प्रस्ताव मान्य केला. त्याआधी अनेक पक्षांनी संपर्क साधला होता, पण मी सौम्यपणे नकार दिला होता. भाजपच्या माध्यमातून जे राष्ट्रप्रेम दिसले, ते इतर कुठल्याही पक्षात पाहायला मिळालं नाही.”

“मी लोकसभेच्या निवडणुकीत काही मतांनी पराभूत झालो, पण त्यानंतर मला राज्यसभेची संधी दिली गेली. माझ्या निवडीनंतर पंतप्रधान मोदींनी मला स्वतः फोन केला. त्यांनी विचारले, ‘मराठीत बोलू का हिंदीत?’ मी हसलो, ते खदखदून हसले. मी मोदींना कधी एवढं खदखदून हसताना पाहिलं नव्हतं. पण अनेक वेळा त्यांच्या हास्यालाही राजकीय अर्थ लावले जातात, म्हणून ते संयमी राहतात,” असा किस्सा सांगत निकम यांनी मोदींच्या व्यक्तिमत्त्वावरही भाष्य केलं.

उज्ज्वल निकम पुढे म्हणाले, “मी गुन्हेगारांना शिक्षा देतोच, पण त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यातील कमजोर बाजू ओळखून न्यायालयात प्रभावी युक्तिवाद करतो, जेणेकरून त्यांना अंतरात्म्याचं दुःखही व्हावं. तुरुंगात मला जर मतदारसंघ मिळाला, तर सर्व कैदी मला निवडून देतील, याची मला खात्री आहे,” असं विनोदी पण विचारप्रवर्तक विधान त्यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *