विशेष प्रतिनिधी
पुणे : वाकडं काम ही गावातील बोली भाषा आहे. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये यासाठी मी बोली भाषेत बोललो होतो. माझ्या बोली भाषेचा विपर्यास केला गेला, असे स्पष्टीकरण कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. (Vakad Kaam Is a Local Phrase My Statement Was Misinterpreted Agriculture Minister Dattatray Bharne”)
भरणे यांना कृषीमंत्रीपद मिळाल्यानंतर एका कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती.कारखान्याचा संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात. पण वाकडं काम करून पुन्हा ते नियमात बसवतो, त्याची माणसं, लोक नोंद ठेवतात, असे वक्तव्य भरणे यांनी केले होते.
याबाबत खुलासा करताना ते म्हणाले. ते म्हणाले, वाकडं काम ही गावातील बोली भाषा आहे, विनाकारण त्या वाक्याचा विपर्यास केला. कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. मी चुकणारा माणूस नाही मी खूप समंजस माणूस आहे, मी असे वक्तव्य करणार नाही.
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता भरणे म्हणाले ”मी जे भाषण केले त्या भाषणाचा पूर्ण सारांश तुम्ही ऐका त्यात मी चुकीचे बोललेलो नाही. संजय राऊत मोठे नेते आहेत, मी त्यांच्यावर बोलणे योग्य नाही.
कर्जमाफीबाबत ते म्हणाले, मी पदभार स्वीकारल्यानंतर या संदर्भातला आढावा घेईल. कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे आमदार रोहित पवार यांनी भरणे यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली होती. ते म्हणले होते की , तुमचं हे पहिलचं वक्तव्य आहे आणि ते इतकं घातक आहे. तुम्ही काय म्हणलात की वाकडी कामं सुद्धा आपल्याला करावी लागतात. अनेक नेत्यांनी वेडवाकडी कामं करून राज्याची तिजोरी वेडवाकडी केलेली आहे.
