विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विविध राज्यांमधील संकेतस्थळे बंद असल्याच्या आणि त्यावरील मतदार याद्यांची माहिती गहाळ असल्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दाव्यांचा निवडणूक आयोगाने इन्कार केला. तसेच मतदार यादीतील घोळावर केलेल्या दाव्यांबद्दल शपथपत्र दाखल करण्याचे आवाहनही निवडणूक आयोगाने राहुल यांना केले. दरम्यान, राहुल गांधी शपथपत्र देऊ शकत नसतील तर त्यांनी बेताल आरोपांबद्दल देशाची माफी मागावी, असे आव्हानही आयोगाने दिले.
( If you cannot give an affidavit then apologize to the country for the baseless allegations Election Commission challenges Rahul Gandhi)
राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत मतदान चोरीचा आरोप करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. त्यावर निवडणूक आयोगाने, ‘राहुल यांना त्यांच्या विश्लेषणावर विश्वास असेल आणि केलेले आरोप खरे आहेत, असे त्यांना वाटत असेल तर त्यांना निवडणूक नियमांनुसार शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यास आणि मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने जोडलेली किंवा काढून टाकलेली नावे सादर करण्यास कोणतीही अडचण नसावी.’ तथापि, राहुल यांनी स्वाक्षरी केली नाही, तर त्यांना त्यांच्याच विश्लेषणावर आणि निष्कर्षांवर, निरर्थक आरोपांवर विश्वास नाही, असा त्याचा अर्थ होईल, अशा परिस्थितीत त्यांनी देशाची माफी मागावी.
मतचोरीचे आरोप करून राहुल गांधी स्वतःच्याच पायावर कुन्हाड मारू घेत आहेत. राहुल यांनी आपला युक्तिवाद मांडण्यासाठी बरीच तयारी केली होती, परंतु त्यांच्या आरोपाचे मूलभूत तर्क चुकीचे आहेत, असा दावा भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी केला. निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक संस्थेच्या अधिकाऱ्यांना भाजपला मदत करण्याच्या भूमिकेचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा राहुल गांधी यांनी दिला होता. त्यावरूनही यादव यांनी राहुल यांच्यावर टीका केली.
निवडणूक आयोग भाजपशी खुलेआम संगनमत करत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. राहुल यांनी त्यांच्या ‘युट्यूब’ वाहिनीवर प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत हा आरोप केला. ‘आम्ही त्यांची चोरी पकडली’, हे निवडणूक आयोगाला माहीत असल्याने बिहारमध्ये ‘एसआयआर’ केले जात आहे, असा दावा राहुल यांनी केला.
मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने समाविष्ट केलेल्या किंवा वगळलेल्या मतदारांची नावे आणि निवडणूक अधिकाऱ्यांना या प्रकरणात आवश्यक कार्यवाही सुरू करण्यासाठी शपथपत्र देण्याचे आवाहन तीन राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना केले आहे. त्यावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वढेरा यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. तसेच राहुल गांधी यांच्या हेराफेरीच्या दाव्यांची चौकशी करण्याची मागणी लावून केली.
बिहारच्या प्रारूप मतदार यादीतून नावे समाविष्ट करण्यासाठी किंवा वगळण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष निवडणूक आयोगाकडे संपर्क साधत नाही. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर कोणता आक्षेप का नोंदविला नाही, असा प्रश्न निवडणूक आयोगाने उपस्थित केल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेस नेते त्यांचे दावे आणि आक्षेप आता नोंदविण्याऐवजी बहुतेक निवडणुकांनंतरच नोंदवतील,’ असा टोलाही आयोगाने लगावल्याचे सूत्रांनी सांगितले.
