विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला जात असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे वाहतूक काेंडीत अडकले हाेते. यावर त्यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. सगळीकडेच वाहतूक कोंडी झाली आहे, नेतेच याला जबाबदार आहेत. त्यामुळेच मी मुंबईतही गणपती दर्शनाला कधी जात नाही. आम्ही आत जातो, गणपतीचे आशीर्वाद घेतो व बाहेर आल्यावर लोकांच्या शिव्या खातो, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ( Raj Thackeray Fumes Over Punes Traffic ChaosSays He Avoids Ganpati Visits Because of Jams)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीसाठी मध्यवर्ती भागातील सावित्रीबाई फुले स्मारक निवडल्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली.बैठकस्थळी येण्याआधी राज ठाकरे रविवार पेठेतील प्रल्हाद गवळी या पदाधिकाऱ्याच्या गणेशमूर्ती विनामूल्य देण्याच्या स्टॉलवर गेले होते. तिथे ते वाहतूक कोंडीत अडकले. तिथून सुटका झाल्यावर ते गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे अभिवादन करण्यासाठी गेले. तिथेही त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तिथून पुढच्याच चौकात असलेल्या बैठकस्थळी म्हणजेच सावित्रीबाई फुले स्मारकात येतानाही त्यांचे वाहन एकदोन ठिकाणी अडकून पडले.या सगळ्याचा उद्वेग त्यांनी बैठकीत बोलताना थेटपणे व स्पष्ट शब्दांमध्ये व्यक्त केला.
मध्यवर्ती भागातील स्थळ बैठकीसाठी काेणी निवडले ? असा सवाल करत राज ठाकरे म्हणाले, ‘वाहतूक कोंडी ही आता सर्वच शहरांमधील समस्या झाली आहे. नेते आपापले दौरे करून त्यात आणखी भर टाकतात. याच कारणामुळे मी मुंबईत गणेशोत्सवामध्ये कधीही कोणत्या गणपती दर्शनासाठी जात नाही. त्याचे आशीर्वाद घ्यायचे व नंतर लोकांच्या शिव्या खायच्या याला काहीच अर्थ नाही.’
