ताेंड वर करून विचारणाऱ्यांनी मराठा समाजासाठी काय केले? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई :मराठा समाजासाठी शिक्षणाच्या योजना, वसतीगृहाच्या योजना, वसतीगृह होईपर्यंत भत्त्याच्या योजना सगळे आम्ही केलेले आहे. त्यामुळे काही लोक तोंड वर विचारतात, त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी मराठा समाजासाठी नेमके काय केले? ते सांगावे, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला दिले. (What did those who raised their voices and asked for the Maratha community do Devendra Fadnavis question)

अडीच वर्ष जे सरकार होते, त्या सरकारने मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक निर्णय दाखवा, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला दिले.

वैद्यकीय शिक्षणात इतर मागासवर्गीय प्रवर्गाचा कट ऑफ एसइबीसीपेक्षा जास्त असताे. त्यामुळे आकडेवारी बघा. विचारवंतांनी विचार करावा. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ही मराठा समाजासाठी हिताचे नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकार घेईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे माेर्चाने मुंबईला येण्यासाठी निघाले आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, समाज जन्मभर तुमचे उपकार विसरणार नाही असे जरांगे यांनी म्हटले आहे. यावर पत्रकारांशी बाेलताना मुख्यमंत्री म्हणाले, ओबीसीमध्ये जवळपास 350 जाती आहेत. मेडिकलच्या प्रवेशाचे बघितल्यास ओबीसीचा कटऑफ एसीबीसीच्या वर आहे. एसीबीसीच्या कटऑफ ईडब्ल्यूएसच्या वर आहे. त्यामुळे आताच्या मागणीने किती भले होणार, याची मला कल्पना नाही. आकडेवारी नीट पाहिल्यास मराठा समाजाच्या हिताचे काय आहे, ते आपल्या लक्षात येईल.

मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून मागणी केली पाहिजे, ही जबाबदारी मराठा समाजाच्या नेत्यांची आहे. एसीबीसी किंवा ईडब्ल्यूएसची मागणी असेल, तर राजकीय आरक्षण मिळणार नाही. राजकीय आरक्षणाचा हेतू असेल, तर वेगळी गोष्ट आहे. पण तो हेतू नसेल आणि सामाजिक, आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल, तर मागणीचा योग्यप्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी केला पाहिजे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शरद पवार आणि राेहित पवार यांचा मनाेज जरांगे यांच्या आंदाेलनाला पाठिंबा आहे का? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, मनोज जरांगेंचे आंदोलन कुठेतरी राजकीय होत चाललंय हा प्रश्न आता दिसतोय. यापूर्वी काय झाले? हे सर्वांनी बघितले आहे. आजही आंदोलनासाठी रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत? हे आपल्याला पाहायला मिळतंय. आमच्यासाठी मनोज जरांगेंचे आंदोलन राजकीय नाही. आम्ही त्याला सामाजिक चष्म्यातून पाहू. काही राजकीय पक्ष त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना फायदा होण्याऐवजी नुकसानच होईल.

मराठा समाजाच्या हिताचे सगळे निर्णय मी मुख्यमंत्री आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ 15 वर्ष का स्थापन झाले नाही? 15 वर्षे कुणाची सत्ता होती? असा सवाल करत, मी ते उभे केल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज दीड लाख उद्योजक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने तयार केलेत. सारथीच्या माध्यमातून आयएएस, आयपीएस अधिकारी तयार होत आहेत. एमपीएससीचे विद्यार्थी तयार होत आहेत. स्पर्धा परिक्षांमध्ये विद्याथी टिकत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *