बापाने 70 हजार कोटी पचवले साधी ढेकर दिली नाही, पार्थ पवार जमीन घोटाळ्यावर लक्ष्मण हाके यांचा निशाणा

विशेष प्रतिनिधी

पुणे : बापाने 70 हजार कोटी पचवले साधी ढेकर दिली नाही. पार्थ पवार 1500 कोटींच्या घोटाळ्यात सापडले. पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न 2 चित्रपट बनावा, अशी टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली आहे. ( Father digested 70 thousand crores and did not just burp Laxman Hake targets Parth Pawar over land scam)

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडीया होल्डिंग्स एलएलपी या कंपनीवर गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
अमेडीया कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. खरेदी व्यवहारानंतर अवघ्या दोन दिवसांतच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आले, असा दावाही करण्यात आला आहे.

यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे की, पार्थ पवारांच्या गंडलेल्या घोटाळ्यावर मुळशी पॅटर्न २ चित्रपट बनावा. ( पवार पॅटर्न बारामती ) 1800 कोटींची महार वतनाची जागा 300 कोटीत लाटण्याचं काम पार्थ पवारने केलं. आई वडिलांकडून मुलं संस्कार शिकत असतात. पार्थ पवार दोन तीन वर्षांचे होते. तेव्हा अजित पवार व सुनेत्रा पवारांनी बारामतीच्या सोनगावमधील ३ एकर महार वतन लाटले आणि पार्थ पवारच्या नावे केले, अशी पत्रकार परिषद बहुजन नेते काळुराम चौधरी यांनी केली म्हणजे बारा खडी शिकायच्या वयात सातबारा फिरवण्याची कला पार्थ पवारांना शिकवण्यात आली.

बापाने ७० हजार कोटी पचवले साधी ढेकर दिली नाही. पार्थ पवार १५०० कोटींच्या घोटाळ्यात सापडले. ‘नया है वह’ म्हणत त्यांना सोडूनच दिले जाईल. नवा जमीन घोटाळा करताना पार्थ पवारांनी जुन्या चुका करु नयेत.

उदा. एक लाख रुपये भागभांडवल असणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून ३०० कोटींचा व्यवहार करु नये. शेकडो कोटींचा व्यवहार फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करु नये. सरकारी खात्याची जमीन खासगी कंपनीकडे घेताना अधिकची काळजी बाळगावी.

भविष्य काळात मरिनड्राईव्ह, ताज हॉटेल, मलबार हिल्स, विधानभवन अशा जागांवर हात मारावा. किरकोळ महार वतनांच्या जमीनींकडे दुर्लक्ष करावे. प्रत्येकाकडे कला असते. पवारांच्या हातात जमीनी गायब करण्याची जादूची कांडी आहे. त्याचं व्यवस्थित प्रशिक्षण पार्थ पवारांनी घ्यावं. भविष्यात 15, 20 हजार कोटींच्या जमीन खरेदीचा घोटाळा करावा.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेची शिखरं गाठली ती दलित, मुस्लीम, ओबीसी, उपेक्षित घटकांच्या नरडीवर टाच ठेवून. पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव हे आहे की सरंजामी पद्धतीचं राजकारण करणाऱ्यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता आहे. पार्थ पवारने महार वतनाची जमीन कंपनीच्या नावे केली तेव्हा जणांना उचलून आणलं? किती लोकांच्या मनात माती कालवली नेमकं या प्रकरणात काय काय घडलं असेल? याचं सत्य महाराष्ट्रापुढे येईल असे वाटत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *