मतदार यादीतील नावाविषयी 27 नोव्हेंबर पर्यंत करता येणार तक्रार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार यादीची प्रक्रिया वेगाने सुरू असून, संबंधित मतदारांनी आपल्या नावाविषयी काही हरकती किंवा तक्रारी असल्यास त्या 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी स्वरूपात दाखल कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.
( Complaints on Voter List Entries Allowed Until November 27)
प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन करताना होऊ शकणाऱ्या चुका त्वरित दुरुस्त करण्यासाठी आयोगाने जनजागृती सुरू केली आहे. या प्रक्रियेचा थेट संबंध निवडणूक व्यवस्थेच्या पारदर्शकतेशी असल्याने नागरिकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

महानगरपालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करण्यात आला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्याच महानगरपालिका निवडणुकांसाठी मूळ आधार मानल्या जाणार आहेत. या याद्या भारत निवडणूक आयोगाने तयार केल्या असून, त्यांचे प्रभागनिहाय विभाजन स्थानिक महानगरपालिका आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 20 नोव्हेंबर 2025 रोजी सार्वजनिक करण्यात आल्या असून, प्रत्येक प्रभागातील मतदार आपले नाव ऑनलाईन तपासू शकतात. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/SearchName ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे किंवा मतदारांचे पत्ते दुरुस्त करणे यासारखी कार्यवाही या टप्प्यात केली जात नाही. हे काम केवळ भारत निवडणूक आयोगाच्या नियमित अद्ययावत प्रक्रियेतच केले जाते. महानगरपालिका स्तरावर केवळ विधानसभेच्या याद्यांवर आधारित प्रभागनिहाय विभागणी केली जाते. त्यामुळे नागरिकांनी या प्रक्रियेतील मर्यादा समजून घेत हरकती केवळ प्रभागनिहाय विभागणीतील चुका किंवा चुकीच्या नावांच्या स्थानांतरांसंदर्भातच कराव्यात, असे आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत.

अनेकदा लेखनिकांकडून झालेल्या तांत्रिक किंवा टायपिंगच्या चुकांमुळे मतदाराचे नाव चुकीच्या प्रभागात दिसणे, विधानसभेच्या यादीत असूनही प्रभागात न दिसणे किंवा घर क्रमांकाच्या आधारे प्रभाग बदलण्यात गफलत होणे असे प्रकार आढळून येतात. अशा स्वरूपाच्या चुकांबाबत संबंधित महानगरपालिकेत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. आयोगाने यासाठी स्वतंत्र काऊंटर व अधिकारी नेमण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी वेळेत तक्रार केल्यास निवडणूकपूर्व काळात याबाबत आवश्यक दुरुस्ती केली जाईल.

मतदार यादी ही निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची कडी मानली जाते आणि त्यात नाव नसल्यास नागरिकांना मतदानाचा हक्क बजावणे अशक्य होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रत्येक मतदाराने स्वतःचे नाव, पत्ता आणि प्रभाग तपासावा. काही विसंगती आढळल्यास 27 नोव्हेंबरपूर्वी महानगरपालिकेत हरकत दाखल करावी. आयोगाने माहिती मिळवण्यासाठी ऑनलाईन सेवा, हेल्पलाइन तसेच संबंधित कार्यालयांमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, मतदारांनी सक्रियपणे सहभाग घेणे ही लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक बाब असल्याचा संदेशही आयोगाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *