भारतीय रेल्वे ही प्रवाशांच्या सुविधेसह देशातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांच्या प्रगतीची वाहक आहे. रेल्वे यंत्रणेत अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसह भारतीय रेल्वेचा कायाकल्प होत असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
मागील दहा वर्षात रेल्वेच्या विविध यंत्रणात अभूतपूर्व बदल झाले असून रेल्वेसाठीच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी व प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देतानाच भारतीय रेल्वे पर्यावरणपूरक होत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे मध्य व पश्चिम रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानके व रेल्वे उड्डाणपूल व रेल्वे अंडरपासचे भूमिपूजन व लोकार्पण, उद्घाटन कार्यक्रम झाला. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ई – उपस्थिती होती. मरिन लाईन्स रेल्वे स्थानक, मुंबई येथे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी आमदार राज पुरोहित, अपर महाप्रबंधक प्रकाश मिश्र हे उपस्थित होते.४१ हजार कोटींचे रेल्वे प्रकल्प, अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत ५५४ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, १५०० ओव्हर ब्रीज आणि अंडरपासचे भूमिपूजन व लोकार्पण, उद्घाटन यावेळी करण्यात आले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर व प्रचंड गतीने होत आहेत. याद्वारेच रोजगारासाठीही मोठी चालना मिळत आहे. रेल्वे यंत्रणाही वेगाने बदलत आहे. रेल्वेचा कायापालट होत आहे. रेल्वेस्थानके अत्याधुनिक सुविधांनी युक्त करण्यासाठी अमृत भारत रेल्वेस्टेशन योजनेचा आरंभ करण्यात आला. या अत्याधुनिकीकरणामुळे रेल्वे स्थानक परिसरात रोजगार निर्मितीलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. अमृत भारत स्टेशन योजना विरासत आणि विकास या दोन्हीचे प्रतिक आहे. प्रत्येक रेल्वेस्थानकाची उभारणी ही तेथील सांस्कृतिक, ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे. या स्थानकांमध्ये दिव्यांग आणि वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा असतील. रेल्वेचे मोठ्या प्रमाणावर विद्युतीकरण करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकावरील स्वच्छता हे आज वैशिष्ट्य झाले आहे. भारतीय रेल्वे देशवासीयांसाठी ‘ईज ऑल ट्रव्हल’ झाले आहे. भारतीय रेल्वे विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. ‘वन नेशन वन प्रॉडक्ट’ ही योजनाही रोजगार निर्मितीला चालना देणारी ठरत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या महानगरातून दररोज किमान ७३ लाख प्रवासी उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात. एवढ्या संख्येने प्रवास करणारे प्रवासी असलेले हे एकमेव शहर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील २०५१ विविध रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन झाले ही विशेष आनंदाची बाब असून या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांचा समावेश असून ५६ स्थानकांचा त्यात समावेश आहे.
महाराष्ट्रात रेल्वे पायाभूत सुविधांची अभूतपूर्व उभारणी
महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून मोठी मदत होत आहे. सध्या राज्यात २२७४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अमृत भारत स्टेशन, रोड ओव्हर ब्रीज ROB आणि RUB असे २४१ रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी १५ हजार ५५४ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ५६ स्थानके जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके म्हणून विकसित करण्यात येणार आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे अन्य इन्फ्रा प्रोजेक्टप्रमाणे महाराष्ट्रातील रेल्वे मार्गांच्या विस्ताराला बळ मिळत आहे. राज्यातील रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठीही केंद्राचे विशेष पाठबळ लाभत आहे. वंदे भारत या श्रेणीतही महाराष्ट्राला सात नव्या रेल्वेगाड्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे देशातील वंदे भारत रेल्वेगाड्यांची निर्मिती लातूर येथील कारखान्यात होणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या महत्वाकांक्षी प्रकल्पातील अडथळेही दूर करण्यात आले असून या मार्गासाठी आवश्यक असलेली भू-संपादनाची प्रक्रीया जवळपास पूर्ण झाली आहे. लवकरच बुलेट ट्रेनचे काम पूर्ण होऊन भारतातील पहिली बुलेट ट्रेन धावायला लागेल.
प्रवाशांना सुखकर, गतिमान प्रवासाचा अनुभव
रेल्वे प्रवाशांना सुखकर प्रवास करता यावा, यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश येत आहे. रेल्वेच्या विविध प्रकल्पांमुळे प्रवाशांना सुखकर, गतिमान प्रवासाचा अनुभव मिळतानाच रेल्वे स्थानकांचे रुप पालटलेले दिसत आहे. एसी लोकल सुरू झाल्या आहेत. त्यांची संख्याही वाढविण्यात येत आहे.
