आमची काय जबाबदारी? साहित्य महामंडळाकडून संजय राऊत यांना थेट उत्तर


विशेष प्रतिनिधी 
 
नवी दिल्ली: शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राजकीय गदारोळात साहित्य महामंडळाला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र साहित्य महामंडळाने राऊत यांना उत्तर देत आमची काहीही जबाबदारी नसल्याचे म्हटले आहे. ( Its not our responsibility, Reply to Sanjay Raut from Sahitya Mahamandal )
 
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा आरोप शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलत होत्या.  संजय राऊत यांनी  थेट अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
उषा तांबे यांनी संजय राऊत यांच्या या आरोपांना उत्तर दिलं आहे. व्यासपीठावर मुलाखतकाराने कोणता प्रश्न विचारावा याची जबाबदारी साहित्य महामंडळाकडे नाही, या सगळ्या संदर्भात काहीतरी गैरसमज झाला असावा असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच संजय राऊत यांचे पत्र माझ्यापर्यंत पोहोचले नाही, असा खुलासाही त्यांनी केला आहे.
दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. हे साहित्य महामंडळाच्या परंपरेस शोभणारे नाही. काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा गैरवापर केला, आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले. त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला होता, तसेच  साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय व सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरीत माफी मागावी अशी मागणी संजय राऊत यांनी पत्राद्वारे केली होती. या पत्राला उषा तांबे यांनी उत्तर दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *