राज्यातील गुन्ह्यांची संख्या घटली, मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीसह दिले विरोधकांना उत्तर
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गुन्हेगारी वाढल्याच्या विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह उत्तर दिले आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्राचा गुन्हेगारीत आठवा क्रमांक आहे, त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. (The number of crimes in the state has decreased, the Chief Minister gave a reply to the opposition with statistics)
गृह विभागाशी संबंधित प्रश्नांवर विधानसभेत चर्च दरम्यान विरोधकांनी राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी मांडली. इतर राज्यातील आकडेवारीची तुलना केल्यास गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात आठवा तर शहरांमध्ये नागपूरचा सातवा क्रमांक लागतो. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत 2 हजार 586 ने घट झाल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. इतर राज्यातील आकडेवारीची तुलना केल्यास गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात आठवा क्रमांक लागतो असे फडणवीस यांनी यावेळी म्हटले. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्यप्रदेश, ओडिशा, आंध्रप्रदेश देशातील ही प्रमुख राज्ये आपल्या पुढे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, जगात असे कोणतेही राज्य नाही जिथे गुन्हे घडत नाहीत. पण, किती गुन्हे घडले यापेक्षा सुरक्षेची व्याख्या काय हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र हे देशातील अतिशय महत्त्वाचे राज्य आहे. शहरीकरण वाढत असूनही येथील गुन्हेगारीमध्ये त्या तुलनेत वाढ झालेली दिसत नाही. आपण जर शहरांचा विचार केला तर पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही. पहिल्या दहामध्ये सातव्या क्रमाकांवर आपल्याला नागपूर दिसतं. पण ते यासाठी की, नागपूरमध्ये आपण नागपूर ग्रामीणचा जवळपास 25 टक्के भाग सहभागी केला. पण तेथील लोकसंख्येचा समावेश डेटामध्ये झालेला नाही. एनसीआरबीच्या डेटामध्ये ते जनगणनेचीच लोकसंख्या ग्राह्य धरतात. त्यामुळे गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं दिसते. मात्र लोकसंख्या 2011 चीच आहे. जर आपण आताची लोकसंख्या पकडली तर नागपूर हे 22 व्या 23 व्या क्रमांकावर जातं. त्यामुळे विचार केला तर पहिल्या दहामध्ये आपलं कोणतंही शहर नाही, मुंबईसारखं शहर हे पंधराव्या क्रमांकावर आहे. पुणे 18 व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर दिल्ली, दुसऱ्या क्रमांकावर जयपूर तर तिसऱ्या क्रमाकांवर इंदौर असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात जी शहरं आहेत, शहरीकरण आणि विकास इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर देखील इथे कायदा आणि सुवव्यस्था आपल्याला पाहायला मिळते. एकूण गुन्ह्याची संख्या आपण पाहिली तर आकडेवारी महत्त्वाची नसतेच, कारण अनेकदा आकडेवारी ही दिशाभूल करणारी असते. त्याहीपेक्षा वस्तुस्थिती काय आहे हे महत्त्वाचं असते असेही मुख्यमंत्री म्हणाले.
