
राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असून स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. कोविड बाबत नव्याने आदेश जारी करण्यात आले असून त्यात अनेक निर्बंध पुन्हा एकदा लावण्यात आले आहेत
राज्यात करोनाचा धोका वाढला आहे. काल गुरुवारी राज्यात विक्रमी संख्येनं २५ हजार नवीन रुग्ण सापडले होते. त्यामुळं याआधी सरकारने हॉटेल व मंगल कार्यालयांवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यानंतर आज सरकारने नव्यानं नियमावली जारी करत खासगी कार्यालयांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ( आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत नियमावली जारी केली आहे.
सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे.
एकूणच गेल्या वर्षी प्रमाणे पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोनाच्या राक्षसाने आपले डोके वर काढले आहे. ज्याचा परिणाम सामान्य जनतेला निश्चितच भोगावा लागत आहे. महाराष्ट्र सरकार गेल्या वर्षी देखील कोरोनाच्या परिस्थितीशी दोन हात करण्यात अयशस्वी ठरले होते, यावेळी ही परिस्थिती महाराष्ट्र सरकार कशी सांभाळाले हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
