नवी दिल्ली : आता भारत विकसित देशांच्या मागे न जाता स्वतःची भूमिका स्वत: घेत आहे. पूर्वी असे धाडस नव्हते, पण आता भारत कोणत्याही दबावाशिवाय आपले म्हणणे स्पष्टपणे सांगत आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे.
भागवत यांनी वेद संस्कृत ज्ञान गौरव कार्यक्रमात सांगितले की, भारत आपली धार्मिक कर्तव्ये पार पाडण्यात विश्वास ठेवतो आणि अमेरिका, रशिया किंवा चीनसारखे विकसित राष्ट्र बनू इच्छित नाही. भारताचा इतरांची सेवा करण्यावर विश्वास आहे आणि ही परंपरा वेदांपासून पाळली जात आहे. अमेरिका आणि चीनवर सारखे देश मोठे झाल्यावर बाकीचे देश दंडुका चालवण्याचे काम करतात. पूर्वी रशिया चालावयचा, तो अमेरिकेने पाडला आणि आता ते स्वतःचा दंडुका चालवत आहेत. आता चीन आला आहे, तो आता अमेरिकेला मागे ढकलणार असे वाटते. म्हणूनच ते युक्रेनला प्यादे बनवून आपापसात भांडत आहेत.’
भागवत म्हणाले, “यामध्ये दोन्ही देश आपली बाजू घेण्यासाठी भारताशी बोलत आहेत. पण भारत म्हणतो की तुम्ही दोघे आमचे मित्र आहात आणि तुमच्या दोघांमध्ये जो मरतोय, त्याला आधी आम्ही मदत पोहचवू आणि कोणाचीही बाजू घेणार नाही. यापूर्वी असे म्हणण्याची ताकद भारताकडे नव्हती. भारत आता धर्मासाठी पुढे जात आहे. आज भारत युक्रेनला मदत करत आहे. हाच खरा भारत आहे, जो संकटात सर्वांना मदत करतो. ”
भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक करताना मोहन भागवत म्हणाले की, आर्थिक संकटाच्या काळात भारताने श्रीलंकेला मदत केली, युक्रेनला मदत करत आहे. युक्रेनच्या बाबतीत विकसित देश भारताकडे बघत आहेत.
