‘उद्धवजी, हीच ती वेळ! फक्त ‘टोमणे’ मारणार की उत्तरं देणार?’; चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

देशभरातील विरोधकांची दुसरी बैठक आज बंगळुरूत होत आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवा आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. या बैठकीच्या निमित्ताने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी यासाठी त्यांना काही प्रश्न विचारले आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना काही प्रश्न विचारले आहे. ज्या ठिकाणी तुमच्या हजेरीत विरोधकांची बैठक होत आहे, तिथे हिंदू विरोधासाठी, हिंदू मनोधर्य खच्चीकरणासाठी सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार टपून आहे, असं बावनकुळे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी जी यांना विरोध करण्याचा “समान किमान कार्यक्रम “घेऊन बंगरुळूमध्ये गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आज आली आहे.

भाजपाने सरकार असताना मंजूर केलेला” धर्मांतर विरोधी कायदा” नव्या काँग्रेस सरकारने रद्द केला आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाने यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. ज्या ठिकाणी ही बैठक होत आहे, तिथे राष्ट्रएकतेच्या विचारांवर घाला घालण्यात येत आहे.

कोर्टाच्या निर्णयापर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा,अशी मागणी विधानपरिषदेत करणारे तुम्ही या बैठकीत सीमाप्रश्न मांडणार आहात की नाही? भूमिका घेणार आहात की नाही? की फक्त महाराष्ट्रात “टोमणे” मारणार, हात वर करून भाषणबाजी करणार आहात? की, पुन्हा मूग गिळून बसणार? असे जळजळीत सवाल करत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना घेरले आहे.