मनोज जरांगे म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भव्य स्वागत करू..

विशेष प्रतिनिधी
परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या आठ मागण्यांपैकी चार मागण्या तात्काळ मंजूर केल्या होत्या. आता येणाऱ्या 25 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हैदराबाद, सातारा आणि मुंबई गॅझेट लागू करतील. त्यांचे आम्ही भव्य असे स्वागत करू असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी  व्यक्त केला. मुख्यमंत्री मराठा आरक्षणाचा निर्णय 25 तारखेला शंभर टक्के जाहीर करतील असे ते म्हणाले. ( Manoj Jarange said that we will give a grand welcome to Chief Minister Devendra Fadnavis.)
मनोज जरांगे पाटील हे परभणी दौऱ्यावर आले होते परभणी येथील पाथरी रोडवर असलेल्या जीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी  ते उपस्थित होते.
मराठा आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटील यांना पत्रकारांनी  विचारले असता ते म्हणाले, येणाऱ्या 25 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन्ही गॅझेट लागू करतील आम्ही त्यांचा भव्य सत्कार करू.
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस स्पष्ट सांगितले की हे सरकार संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय देणार नाही. कारण संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर आत्तापर्यंत झालेल्या तपासात या सरकारने सहआरोपी कोणालाच केले नाही. साध्या साध्या आरोपानंतर कोणालाही ईडी लावणारे हे सरकार मात्र वाल्मीक कराडला अद्यापही ईडी लावली नाही. अद्यापही आरोपी मोकाट आहेत तसेच मोबाईल मधील डाटा देखील अद्याप समोर आणलेला नाही. त्यामुळे आम्हाला वाटत आहे की हे सरकार संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय देणार नाही.
आमदार सुरेश धस यांनी पक्षाचा दबाव असला तरी धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला नव्हती पाहिजे. तर त्यांना मराठा समाजाने डोक्यावर घेतले असते, असे सांगून धनंजय मुंडे हा  पैसा पद आणि राजकारणाला हपापलेला माणूस आहे असा आरोप त्यांनी केला.
आमदार सुरेश धस यांच्यावर मराठा समाजाने प्रचंड विश्वास टाकला होता कधी नव्हे तो एका मराठा लोकप्रतिनिधी वर राज्यातला मराठा समाज प्रचंड प्रेम करीत होता. मी देखील सुरेश धस यांच्यावर प्रचंड विश्वास टाकला  पण सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची वार्ता कळल्यानंतर मात्र आमचा विश्वास त्यांच्यावरला उडून गेला आहे. आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला पाहिजे नव्हती. जरी त्यांच्यावर पक्षाने दबाव टाकला असला तरी सुरेश धस यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन मराठा समाजासमोर उभे राहिले असते तर मराठा समाजाने त्यांना डोक्यावर घेतले असते. पुन्हा एकदा त्यांना दोन लाख मताच्या फरकांनी विजयी देखील केले असते. पण सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन मराठा समाजाचा तर विश्वासघात केलाच पण माझा देखील त्यांच्यावरला विश्वास उडाला आहे, असेही जरांगे म्हणाले.
धनंजय मुंडे यांना जनतेने मंत्री केलं आहे . जर जनतेला वाटत असेल की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता तर द्यायला पाहिजे होता. पैसा पद आणि राजकारणाला हपापलेला माणूस आहे. तो माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो आणि त्या पैशाच्या जीवावर राजकारण करतो. आतापर्यंत बऱ्याच जणांनी आपल्यावर आरोप झाल्यानंतर पदांचा राजीनामा दिला आहे. पण हा माणूस एवढा हपापल्याला आहे की त्याला सत्तेतील खुर्ची सुटत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *