भारत माता की जय म्हणणारे मुसलमान संघाच्या शाखेत येऊ शकतात…

विशेष प्रतिनिधी

वाराणसी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुसलमान विराेधी असल्याचा गैरसमज नेहमीच पसरविला जाताे. त्यातून संघाची मुसलमान विराेधी प्रतिमा करण्याचा डाव असताे. मात्र,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे( RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी मुस्लिमांविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. जे मुसलमान भारत माता की जय हा नारा देतात आणि भगव्या झेंड्याचा मान राखतात, ते संघाच्या शाखेमध्ये सामील होऊ शकतात, अशी अट भागवत यांनी सांगितली आहे.

वाराणसीच्या दौऱ्यावर असलेले मोहन भागवत हे नगर कॉलनीमधील संघाच्या एका शाखेत गेले होते. यावेळी त्यांनी जातिभेद दूर करणे, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था तसेच सशक्त समाज स्थापन करण्यासह अनेक मुद्यांवर भाष्य केलं. दरम्यान याच कार्यक्रमात एका स्वयंसेवकाने आरएसएस प्रमुखांना असा प्रश्न विचारला की, मुस्लिम आरएसएसमध्ये सामील होऊ शकतात का ?, त्यावर मोहन भागवत यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. ते म्हणाले, शाखेत( RSS) सर्व भारतीयांचे स्वागत आगहे. मात्र त्यासाठी केवळ एक अट आहे, ती म्हणजे शाखेत सामील होण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ‘भारत माता की जय’ असा नारा देताना कोणताही संकोच करू नये. तसेच त्यांनी भगव्या झेंड्याबद्दलही आदर दाखवला पाहिजे.

माेहन भागवत म्हणाले, आपल्या भारत देशात लोकांचे धर्म जरी वेगळे असले तरी सर्वांची संस्कृति एकच आहे. भारतातील सर्व धर्म, पंथ आणि जातीच्या लोकांचे प्रत्येक शाखेत स्वागत करण्यात आले आहे.

लाजपत नगरमधील कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी मोहन भागवत यांची शनिवारी 5 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी काशीच्या वैदिक विद्वानांसोबत बैठक झाली. तेथे त्यांनी भारताला जागतिक नेता बनवण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्यासंदर्भात विद्वानांशी चर्चा केली.