पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, पाकिस्तानच्या विरोधात युद्ध पुकारा, रामदास आठवले यांची मागणी

विशेष प्रतिनिधी

पुणे : जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर आहे, तोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरूच राहणार आहेत. याकरिता माझी भारत सरकारला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे, की पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या व देत नसतील तर पाकिस्तानच्या विरोधात युद्ध पुकारा असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी केले आहे.
( Take over Pakistanoccupied Kashmir declare war against Pakistan Ramdas Athawales demand)

लोणावळा शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आठवले लोणावळ्यात आले होते. पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला निंदनीय आहे. त्याच मार्गाने दहशतवादी भारतात येतात. त्यामुळे तो भाग भारतात घेणे आवश्यक आहे. पाकिस्तानने देखील तो भाग सोडावा, नाहीतर आम्ही युद्ध केल्याशिवाय राहणार नाही, आमचं सरकार याविषयी गंभीर आहे, विरोधकांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोणावळा येथे व्यक्त केले आहे.

न पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं चारही बाजुनं पाकिस्तानची कोंडी केली आहे. जगातील अनेक मोठ्या देशांचा भारताला पाठिंबा मिळाला आहे. भारताकडून सिंधू नदीच्या पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे, तसेच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढला आहे.