संजय राऊतांना लागली मिरची, शरद पवारांनाच सुनावले

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना चांगलीच मिरची लागली आहे. राऊतांनी शरद पवारांनाच सुनावले आहे. (Sanjay Raut criticizes Sharad Pawar for supporting Amit Shah)

अमित शहा यांनी अत्यंत समंजस भूमिका घेतल्याचे म्हणत पवारांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या भूमिकेवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवारांनी अमित शहांचे समर्थन करू नये, असे म्हणत राऊतांनी 26/11 हल्ल्याच्या घटनेची आठवण करून दिली आहे

पहलगाम येथे 27 निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सरकारने या हल्ल्याचा बदला घ्यावा, अशी भावना सर्वच नागरिक व्यक्त करत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. देशावर हल्ला झालेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र बिहार निवडणुकीचा प्रचार करण्यात आणि मुंबईत चित्रपटसृष्टीच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे म्हणत राऊतांनी निशाणा साधला. याचवेळी राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खोचक शब्दात सुनावले. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यामुळे शरद पवार गटाने गृहमंत्री अमित शहांना पाठिंबा असल्याचे म्हटले, ज्यावर राऊतांनी नाराजी व्यक्त केली.

संजय राऊत म्हणाले की, सरकार दहशतवादाविरोधात जी काही कारवाई करेल, त्यासाठी सरकाराला आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले. पण सरकारच्या चुकांना आमचे समर्थन नाही. महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी सुद्धा मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांचा सरकारच्या चुकांना सुद्धा पाठिंबा आहे का? असा सवाल राऊतांनी शरद पवार यांचे नाव न घेता उपस्थित केला आहे. ज्यांना समर्थन द्यायचे आहे, त्यांनी द्यावे, कारण ते जनतेच्या भावनांशी खेळत असल्याचा टोला त्यांनी सहकारी पक्षांना लगावला आहे.

गृहमंत्री अमित शहा या घटनांना जबाबदार असतील तर पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घ्यायला हवा, असे सांगत राऊतांनी म्हटले की, याआधी शिवराज पाटलांचा राजीनामा घेण्यात आला होता. 26/11 च्या हल्ल्यानंतर आर. आर. पाटलांचाही राजीनामा घेण्यात आला होता. मग आर. आर. पाटील यांचा राजीनामा त्यावेळी शरद पवारांनी का घेतला होता. जर पवारांना अमित शहांचा राजीनामा नको, मग महाराष्ट्रात जो 26/11 चा हल्ला झाला, त्यावेळी लोकभावनेचा आदर करून शरद पवारांनी त्यावेळी राज्याचे गृहमंत्री असलेले आर. आर. पाटील यांचा आणि काँग्रेसने तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा राजीनामा घेतला, याची आठवण राऊतांनी करून दिली.

माझ्याकडे प्रत्येक संदर्भ आहे. मी जे बोलत आहे, त्या जनभावना आहे. इतिहासाला धरून बोलत आहे. आर. आर. पाटील यांचा त्यांनी (शरद पवार यांनी) राजीनामा घेतला. गरज नसताना विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे समर्थन करू नये, असे राऊतांनी सांगितले.