विशेष प्रतिनिधी
मुंबई : इस्टाग्रामसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून आशय निर्मितीचे लोकशाहीकरण होत आहे. आज ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे, तो कोणीही सर्जक आणि निर्माता होऊ शकतो. भारताच्या सृजनशील वारशामुळे भारतीय युवा पिढीसाठी हा काळ ‘सुवर्णसंधी’ असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने व्यक्त केले. ( Anyone with a smartphone can become a producersays Shraddha Kapoor A new chapter in digital content creation in India)
वेव्हज 2025 या परिषदेत श्रद्धा बोलत होती. ती म्हणाली, आपण लहानपणापासून गोष्टी ऐकतच मोठे झालो आहोत. त्या कथा आपल्या विचारांचे, मूल्यांचे आणि दृष्टिकोनाचे मूळ आहेत. आज डिजिटल तंत्रज्ञान, सहज उपलब्ध डेटा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या कथांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची संधी निर्माण झाली आहे.
मी नेहमीच आशय धोरणात्मक पद्धतीने न बनवता, मनापासून तयार करते. जेव्हा आशय प्रामाणिक असतो, तेव्हा तो लोकांच्या मनाला भिडतो, असे सांगून श्रद्धा म्हणाली, इस्टाग्रामसारखे प्लॅटफॉर्म, ट्रेंडिंग ऑडिओ, व्हायरल हॅशटॅग्स आणि रील्सचा प्रभाव वाढला आहे. मीम संस्कृती ही नव्या पिढीचा संवादाचा एक भाग बनली आहे. प्रत्येक पिढी आपला आवाज, आपली शैली शोधते आणि ट्रेंड्स इतक्या वेगाने तयार होतात की ते पाहणंही रोचक आहे.”
परिसंवादात सहभागी इंस्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी भारतातील डिजिटल बदलांविषयी आपले विचार मांडले. ते म्हणाले, “भारतात सध्या जे डिजिटल परिवर्तन सुरू आहे, ते जगातील सर्वात वेगवान आहे. परवडणारा डेटा, हाय-स्पीड इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे भारतीय सर्जकांसमोर संधींचा महापूर आहे.”
रील्स ही आज सोशल मीडियावरील प्रभावी अभिव्यक्तीचा प्रमुख प्रकार बनली आहे. कमी वेळात प्रभावी आशय मांडण्यासाठी रील्स हे अत्यंत सशक्त माध्यम ठरत आहे. प्रत्येकाला जागतिक प्रेक्षकांशी जोडणाऱ्या या प्लॅटफॉर्मने डिजिटल कथाकथनाच्या संधी निर्माण केल्या आहेत.”
