विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) नऊ दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेतली. या बैठकीत जम्मू-काश्मीर, लडाखचे उपराज्यपाल, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल या राज्यांचे मुख्यमंत्री आणि सिक्कीम सरकारचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
( Amit Shah directs border states to remain alert)
या बैठकीत शहा म्हणाले, “पहलगाम येथे २६ निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देण्याचा संकल्प केला होता.हा संकल्प पूर्ण झाला आहे.
शहा यांनी सीमावर्ती राज्यांतील मुख्यमंत्री आणि प्रशासनाला आवश्यक सेवा उदा. रुग्णालये, अग्निशमन दल, औषधे व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहील यासाठी सर्व तयारी ठेवण्याचे आदेश दिले.
सर्व राज्यांनी मॉक ड्रिलसाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयारी पूर्ण ठेवावी. आपत्ती निवारण दल, सिव्हिल डिफेन्स, होमगार्ड्स आणि एनसीसी यांना सतर्क ठेवावे. नागरिक व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढवावा,असेही शहा यांनी सांगितले.
स्थानिक प्रशासन, सैन्य आणि निमलष्करी दलांमध्ये समन्वय अधिक बळकट करण्याचे प्रयत्न व्हावेत,” अशी सूचना देखील त्यांनी केली.
