शरद पवार आता भाजपामय, प्रकाश आंबेडकर यांची टीका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांची मिलीभगत आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करीत आहेत. भारत पाक अघोषित युद्धात चांगले काम केल्याचे सर्टिफिकेटही शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना दिले. शरद पवार आता भाजपामय होत आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ( Sharad Pawar will joins BJP Prakash Ambedkar criticizes him)

पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात वेगळ्याच हालचाली सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात शरद पवार गट सामील होईल असेच काहीसे चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आम्ही भाजपा हा पक्ष वगळता कोणाशीही युती करायला तयार आहोत. राज्यात जनतेचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी विरोधी पक्षच नाही. जे कोणी आहेत त्यांची आणि सत्ताधाऱ्यांची मिलीभगत आहे. त्यामुळे कोणत्याच मुद्यावर कोणी प्रश्न उपस्थित करीत नाही, ही आजची स्थिती आहे.

छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असला तरी त्याचा ओबीसी समाजाचा काय फायदा होईल, याबाबत मला शंका आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना फी परवडत नाही, हे दिसत आहे. प्रवेश मिळाला, तरी ते घेत नाही, अशी परिस्थिती आहे. छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाचा प्रश्न कसा घेऊन लढतील, ते पाहू, अशी शंका प्रकाश आंबडेकर यांनी व्यक्त केली.

म्ह भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्वतःची आणि त्यांच्या खुर्चीची इभ्रत व गरिमा राखली पाहिजे. जेव्हा ते खुर्चीवर बसतात, तेव्हा ज्यांनी त्यांच्या सन्मानाकडे दुर्लक्ष केले, अशा सेक्रेटरींना त्यांनी नोटीस बजावली पाहिजे. तुम्हाला लोकांनी त्या पदावर बसवले आहे, त्यामुळे त्या पदाची प्रतिष्ठा राखणे तुमचे कर्तव्य आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.