मनसे – ठाकरे गट युतीबाबत अमित ठाकरे यांचे सूचक वक्तव्य :दोन भावांनी बोललं पाहिजे, आम्ही बोलून काही फरक पडणार नाही

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) युतीच्या शक्यतेवर मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मौन सोडले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “दोन भावांनी म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांशी थेट संवाद साधावा. त्यांच्याकडे एकमेकांचे मोबाईल नंबर आहेत. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही” (Amit Thackerays suggestive statement on MNS-Thackeray faction allianceThe two brothers should talk it wont make any difference if we talk)

अमित ठाकरे म्हणाले, “मी २०१४, २०१७ आणि कोरोना काळ पाहिलाय. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा राज साहेबांनी त्यांना सर्वात आधी फोन केला होता. त्यांनी साथ देण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे दोन पक्षांमध्ये युती होण्याचा मार्ग खुला आहे, पण ती केवळ माध्यमांमधून किंवा व्याख्याने देऊन होत नाही. दोघांनी फोन करून चर्चा करावी. मनसेच्या वतीने युतीस काही हरकत नाही. “मी म्हणतो, दोन भाऊ एकत्र आले, तर मला कोणताही प्रश्न नाही. परंतु हे मीडियात बोलून नाही होत. संवादाने आणि विश्वासाने होते.

यासंदर्भात उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी याआधीच सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यांनी म्हटले होते की, “आमचे मन साफ आहे. मराठी माणसाच्या हितासाठी जो कोणी आमच्यासोबत यायला तयार असेल, त्यांना आम्ही बरोबर घेऊन लढत राहू. आमचे नेते दीपेश म्हात्रे आणि मनसेचे नेते राजू पाटील यांनी अलीकडेच संयुक्त आंदोलन केले. ही आमच्या भावना निर्मळ असल्याचीच साक्ष आहे.”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, “राज ठाकरे यांनी स्वतंत्रपणे मराठी माणसाचा विचार घेऊन संघटना उभी केली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोणताही त्याग करण्यास तयार आहोत. आमचे सर्व नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि आम्ही युतीबाबत एकसंध आवाजात बोलत आहोत. आमच्या भावना निर्मळ, स्पष्ट व प्रामाणिक आहेत.