विशेष प्रतिनिधी
सांगली : “ज्यांनी हिंदुत्वाचा मार्ग सोडला, त्यांची अवस्था आज संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. आमच्या खणखणीत हिंदुत्वाची धास्ती घेत ठाकरे बंधू एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा घणाघात मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी केला.
( The Thackeray brothers are united because of fear of our Hindutva Nitesh Ranes attack)
उमदी येथे खासदार संजय तेली यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिनंदन सोहळ्यात राणे बोलत होते. “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे हिंदुत्वासाठी वेगळे झाले नाहीत, तसंच आता ते हिंदुत्वासाठी एकत्र येत नाहीत. त्यांचं एकत्र येणं हे केवळ त्यांच्या मुलांच्या राजकीय भवितव्यासाठी आहे. सत्तेची आणि पक्ष टिकवण्याची ही डावपेचांची युती आहे,” असे त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले, “आज महाराष्ट्रात एकाच खऱ्या हिंदुत्वाचा चेहरा आहे आणि तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ‘हिंदुत्व’ हा फक्त नारा न राहता आता कार्यपद्धती बनलेली आहे. आज अजित पवारांनाही जर ‘पवार ब्रँड’ मोठा करायचा असेल, तर त्यांनाही हिंदुत्वाच्या जवळ यावं लागेल. आता महाराष्ट्रात पवार आणि ठाकरे उरले असले, तरी प्रभावशील नेतृत्व देवेंद्र फडणवीसांचंच आहे.”
गोपीचंद पडळकर यांचे कौतुक करताना राणे म्हणाले की, “ते महाराष्ट्राच्या कोपऱ्या-कोपऱ्यात फिरून हिंदुत्वाचा प्रचार करत आहेत. जे जिहादी विचारांना विरोध करतात, अशा स्पष्ट भूमिका ते घेत आहेत. ”
दरम्यान, शिवसेना (उद्धव गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच दिलेल्या वक्तव्यात म्हटलं होतं, “राज ठाकरे आणि माझ्यात युती होणार की नाही, याबद्दल मी तुम्हाला संदेश देणार नाही, तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यामुळे वावड्यांपेक्षा आम्ही जे ठरवू तेच सगळ्यांसमोर मांडू.”
दरम्यान, मनसे आणि शिवसेना उद्धव गटातील काही नेत्यांच्या अलीकडील विधानांमुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता चर्चेत आहे. मात्र, यामागे खरे कारण हिंदुत्व नसून, आपापल्या पक्षाचा टिकाव आणि पुढील निवडणुकांतील गणिते असल्याचं भाजपच्या गोटातून बोललं जात आहे.
