कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, दोन जण वाहून गेल्याची मुख्यमंत्र्यांची प्राथमिक माहिती

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे जवळीस प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. यामध्ये पर्यटनासाठी आलेले 20 ते 25 जण वाहून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 5 जणांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
( The bridge over the Indrayani river near Kundmalai collapsed two people were swept away according to the Chief Ministers initial information.)

रविवार असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले होते. मात्र अचानक हा जुना पूल कोसळल्याने अनेक जण नदीत बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये स्थानिक किती होते आणि पर्यटक किती होते. याची संपुर्ण माहिती समोर आलेली नाही. मात्र 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच 5 जणांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळतातच अग्निशमनदल, पोलिस आणि एमडीआरफचे बचाव पथक हे बचाव कार्यासाठी दाखल झाले आहेत. तसेच वाहून गेलेल्या पर्यकांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान पुण्यातील विविध पर्यटन स्थळी पावसाळी सुरू झाला की, पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र मावळ येथे घडलेल्या या दुर्घटनेमध्ये इंद्रायणी नदीचं मोठं पात्र याठिकाणी असल्याने पर्यटकांच्या जीवाला जास्त धोका आहे. तसेच हा पूल जुन्या अवस्थेत होता.मात्र लोक मोठ्या प्रमाणात त्यावरून ये जा करत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करताना म्हटले की, पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले आहे. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे म्हणत फडणवीस यांनी शोक व्यक्त केला.
दुर्घटनेबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. या दुर्घटनेत 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.