विशेष प्रतिनिधी
मुंबई: शक्तिपीठ महामार्गासंदर्भात सध्या जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम सुरू आहे. परंतु हा महामार्ग जनतेच्या हिताचा असून प्रत्येकाला विश्वासात घेऊनच हा महामार्ग होणार आहे. त्यामुळे सध्याच्या आराखड्यात 100 टक्के बदल होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
( Nitesh Rane alleges that there is a misunderstanding among the public regarding the Shaktipeeth Highway.)
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी देण्यात आल्यानंतर राज्यभरात विविध जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत आहे. दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री नितेश राणे जिल्ह्यात आले असताना यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
नितेश राणे म्हणाले की, लोकांमध्ये गैरसमज पसरवून त्यांची डोकी भडकवण्याच काम सध्या सुरू आहे. हे मी कदापी खपवून घेणार नाही. शक्तिपीठ महामार्ग होताना प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच शक्तिपीठ महामार्ग होणार आहे. शक्तिपीठ महामार्गाचा सध्याचा जो आराखडा आहे, तो आपल्यासाठी योग्य नाही हा प्लॅन 100 टक्के आम्ही बदलणार आहोत. शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या हितासाठी आहे. तो मार्ग गोव्याकडे न जाता झिरो पॉईंट किंवा मळगावकडे जाईल अशी दक्षता घेण्यात येईल, असे नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
नितेश राणे म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची माझी चर्चा झाली आहे. तसेच कालच मी एमएसआरटीसी डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत, त्यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे. लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होतोय त्यांना मी राज्य सरकारची स्पष्ट भूमिका सांगेन की, प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच हा महामार्ग होणार आहे. माझी आणि खासदार नारायण राणे यांची दोन आठवड्यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्या बैठकीमध्येच आम्ही स्पष्ट भूमिका संबंधित एमएसआरडीसी आणि अन्य अधिकाऱ्यांना सांगितले की, लोकांना विश्वासात घेऊनच महामार्गाचे काम करायचे आहे.
संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पण चर्चा झाली आहे. जे कोण विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की, आम्ही जनतेमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत. लोकांनी आम्हाला आठ-नऊ महिने अगोदरच आमच्या बाजूने मतदान केलेले आहे. त्यामुळे जनतेची चिंता आम्हाला जास्त आहे. लोकांचा आमच्यावर जास्त विश्वास आहे. ज्यांना जनतेने नाकारलेले आहे. ज्यांना घरी बसवलेले आहे. त्यामुळे त्यांनी लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करू नये. तरीही त्यांचे पण काही प्रश्न असतील तर त्यांच्याशी मी स्वतः पालकमंत्री म्हणून संवाद साधायला तयार आहे.
आम्हाला उगाच तिथे वातावरण खराब करायचे नाही. कुठल्याही प्रकारे पोलीस बळाचा वापर करायचा नाही. तरीही जे कोणी आंदोलन करत आहेत, त्यांची जी काही शिष्टमंडळे आहेत. त्यांनी जी काही कुठली तरी समिती केली असेल, त्यांच्या समितीने पालकमंत्री म्हणून माझ्याशी येऊन बोलावे. त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे द्यायची असतील तर मी तयार आहे. कारण आमची भूमिका पारदर्शक आहे. आम्हाला काही लपवालपवी करायची नाही. नॅशनल हायवे तयार केला आहे. तसेच हा शक्तिपीठ हायवे पण लोकांच्या विकासासाठी केला जाईल आणि म्हणून तो मार्ग गोव्याकडे न जाता आता मळगाव किंवा झिरो पॉईंट असा आम्ही सुचवणार आहोत आणि मान्य करून घेण्याची जबाबदारी ही आमची असेल. त्यामुळे याबाबतीमध्ये कुठलाही विरोध करण्याची काही गरज नाही, असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले
