20 वर्ष राज ठाकरेंकडे बघायची उसंत नव्हती, आता सन्माननीय! प्रवीण दरेकर म्हणाले हा तर सत्तेसाठी स्वार्थीपणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरेंना 20 वर्ष राज ठाकरेंकडे बघायची देखील उसंत नव्हती. पण आज त्यांना सन्मानीय राज ठाकरे बोलावं लागलं. यात उद्धव ठाकरेंचा सत्तेसाठी असणारा स्वार्थीपणा दिसून येतोय, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केला. (For 20 years Raj Thackeray was not respected now he is respected Praveen Darekar said this is selfishness for power)

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे लोक फळ येणाऱ्या झाडावरच दगड मारत असतात असा आरोप करत उध्दव ठाकरेंमध्ये शरद पवार यांचीच आयडिओलॉजी भिनली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली.

महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर याचा जल्लोष करण्यासाठी वरळी डोम येथे ठाकरे गट आणि मनसे पक्षाकडून विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावर पत्रकारांशी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाविषयी मळमळ आणि गरळ ओकण्याचे काम सध्या सुरू आहे. दोघांच्या भाषणात महिमामंडन सुरू आहे. परंतु देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे लोक फळ येणाऱ्या झाडावरच दगड मारत असतात. खरं तर आता आपलं कसं होणार? हेच आजच्या इव्हेंटवरून दिसून आलं. कारण दोन्ही नेत्यांची भाषणं ऐकली, तर राज ठाकरे मराठीचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करत होते, स्पष्टीकरण देत होते आणि एकत्र येण्यासाठी आवाहन करत होते. मात्र सत्ता गेल्याचे वैषम्य उद्धव ठाकरेंच्या भाषणात दिसत होतं. राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न या इव्हेंटमधून झाला. झेंडे आणायचे की नाही, मंचावर वर कोणी बसायचं यावरून सगळा गोंधळ होता. राजकारणाचा दर्प या मेळाव्यात दिसत होता.

उद्धव ठाकरेंनी कामासाठी युती केली आहे. त्यांनी किती जणांना यूज अँड थ्रो केलं, याची यादी वाचली तर वेळ कमी पडेल. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मुंबईत शिवसेनेचा महापौर बसला. नाहीतर भाजपाचा महापौर झाला असता. मात्र मोठं मन आणि औदार्य दाखवून देवेंद्र फडणवीस यांनी पहारेकऱ्याची भूमिका घेतली आणि शिवसेनेला महापौर बनवण्याची संधी दिली. पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनी युज अँड थो केलं. उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळ, नारायण राणे, रामदास कदम, दिवाकर रावते यांचाही वापर केला आणि नंतर त्यांची साथ सोडली. इतकेच नाही तर त्यांनी राज ठाकरेंचा सुद्धा वापर करून घेतला आणि नंतर त्यांची साथ सोडली, असा आरोप दरेकर यांनी केला.