विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईच्या मीरा रोड येथे मिठाई दुकानाच्या मालकावर ‘मराठी बोला’ असे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मारहाण केली. मराठी भाषेवरून सुरू असलेली ही भाषिक गुंडगिरी राजकीय संधीसाधूपणासाठी असल्याचा आरोप केला जात आहे. महाराष्ट्रात वाढत असलेली हल्लेखोर प्रवृत्ती राजकीय अस्तित्वासाठीच असल्याचा आरोप केला जात आहे. ( Linguistic bullying for political opportunism rather than love for Marathi)
बाबूलाल खीमजी चौधरी या ४८ वर्षीय व्यापाऱ्याला मराठीतच बोला,अशा धमक्या दिल्या. यामध्ये मनसेचे उपशहरप्रमुख करण कांदांगीरे, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक प्रमोद निलेकट, कार्यकर्ते अक्षय डाळवी, सचिन साळुंखे, अमोल पाटील आणि इतरांचा समावेश होता.
मराठी अस्मितेच्या नावाखाली झालेली ही मारहाण ही महाराष्ट्रातील भाषिक दंडुकेशाहीची केवळ एक झलक आहे. मराठी भाषेचा अभिमान जपणे चुकीचे नाही, पण त्या नावाखाली हिंदी, गुजराती वा अन्य भाषिक नागरिकांवर हल्ले होणे गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. .
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेने पहिलीपासून हिंदी सक्तीच्या कथित निर्णयाविरोधात ‘मराठी माणूस एकवटावा’ अशी भावनात्मक भाषा वापरत राजकीय नाट्य उभे केले आहे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या सोबत त्या जीआरच्या प्रती जाळून निषेध नोंदवला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत या घटनेचा निषेध करत म्हटले आहे की मराठीचा अभिमान बाळगणे चुकीचे नाही, पण भाषा सांगून कोणावर हल्ला केला, तर ती आमच्या सरकारकडून सहन केली जाणार नाही. भाषेच्या नावाखाली कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
या संपूर्ण भाषिक तणावात एक बाब विशेष लक्षवेधी आहे ती म्हणजे उर्दू भाषेवरील मौन. हिंदी ही संस्कृतनिष्ठ भारतीय भाषा असूनही ती उत्तर भारतीयांची ‘थोपवलेली’ भाषा असल्याचे चित्र उभे केले जाते. परंतु, ऐतिहासिकदृष्ट्या परकीय आक्रमणातून उद्भवलेली उर्दू मात्र याच भाषावादी पक्षांकडून कधीही विरोधाच्या केंद्रस्थानी नसते.द्रविड पक्ष, शिवसेना (उबासठा), मनसे, डीएमके आणि कर्नाटकातील काँग्रेस समर्थक संघटनांनी हिंदीविरोधी आंदोलनं चालवली, पण उर्दूवर मात्र एकही टिका होत नाही. हे निवडक भाषिक राष्ट्रवादाचे स्वरूप नेमके कोणत्या समीकरणांवर आधारित आहे, हा मोठा प्रश्न आहे.
बॉलीवूडसारख्या हिंदी-बहुल क्षेत्राला सामावून घेतलेला महाराष्ट्र अनेक भाषिक समुदायांचं घर आहे. मराठी भाषा ही राज्याची अस्मिता आहे, पण त्या नावाखाली इतर भाषिकांवर अन्याय, मारहाण आणि द्वेष पसरवणं महाराष्ट्राच्या सहिष्णूतेच्या परंपरेशी विसंगत आहे, असा आरोप केला जात आहे.
