विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात सध्या मराठी भाषा आणि हिंदी भाषिकांवरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय यांनी उडी घेतली आहे. “हिम्मत असेल तर बॉलिवूडला मुंबईबाहेर काढून दाखवा,” असे थेट खुले आव्हान त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे. ( If you have the courage throw Bollywood out of Mumbai Samajwadi MP Rajiv Rais open challenge to Raj Thackeray)
गेल्या काही दिवसांपासून मनसेने “महाराष्ट्रात राहायचं असेल, तर मराठी बोललीच पाहिजे” असा सक्त पवित्रा घेतल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. यावर आधीच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांना उर्दू, तमिळ आणि तेलगू भाषिकांवरही अशीच कारवाई करून दाखवा, असे आव्हान दिले होते. आता त्याच धर्तीवर समाजवादी खासदार राजीव राय यांनी देखील राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राजीव राय यांनी त्यांच्या X या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले आहे की, “मराठी भाषा ही सन्माननीय आहे, पण त्याच्या नावाखाली गरीब हिंदी भाषिकांवर अन्याय करणं ही भीतीची आणि गुंडगिरीची लक्षणं आहेत. तुमच्या कुटुंबाची अब्जावधी रुपयांची कमाई ही हिंदी चित्रपटसृष्टीमुळे झाली आहे, मग त्या बॉलिवूडविरोधात तुम्ही का बोलत नाही? हिंमत असेल तर हिंदी चित्रपटसृष्टीला मुंबईबाहेर काढून दाखवा.”
राय म्हणाले, “बॉलिवूडनेच मुंबईला ओळख दिली आहे. हजारो मराठी कुटुंब आजही हिंदी सिनेमांमुळे उदरनिर्वाह करतात. तुम्ही हिंदी भाषिक गरीब लोकांवर गुंडगिरी करता आणि त्यातून राजकारण साधता, पण हेच हिंदी भाषिक श्रमिक मुंबईच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलतात हे विसरू नका.”
राजीव राय यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका करत पुढे म्हटले की, “मराठी ही निश्चितच संस्कृतीची भाषा आहे, पण या देशातील कोणताही भाग कोणाच्याही बापाचा नाही. देशात प्रत्येक नागरिकाला कुठेही राहण्याचा आणि काम करण्याचा संविधानिक अधिकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे अभिमान आहेत, केवळ तुमचे नाहीत.”
गुंडगिरीवर औषध आहे. आपली ‘अतिथी देवो भव’ ही संस्कृती विसरू नका. तुम्ही आत्मचिंतन करा, मार्ग सापडेल. संवाद आणि समंजसपणा यानेच देश चालतो, असा सल्लाही राय यांनी राज ठाकरेंना दिला आहे.
