विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडी, अतिक्रमण, पूरस्थिती निर्माण होते. पिण्याच्या पाण्यासह सर्व समस्या सोडविण्यासाठी पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपा, पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि एमआयडीसीने योग्य समन्वयाने नियोजन करावे. उपलब्ध संसाधनाद्वारे नागरिकांना चांगली सेवा देण्यास प्राधान्य द्यावे. विविध समस्येवर तोडगा काढून कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी बृहत आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
( Submit a comprehensive planning plan to solve the problems of Hinjewadikarsorders Chief Minister Devendra Fadnavis)
हिंजवडी आयटी पार्कमधील विविध समस्येबाबत विधानभवनमध्ये आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार शंकर जगताप, शंकर मांडेकर, महेश लांडगे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, प्रधान सचिव गोविंदराज, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगर विकास प्राधिकरण आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उद्योग विकास आयुक्त पी. वेलारासू यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, हिंजवडी येथील रहिवासी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीमुळे हजारो आयटी अभियंते, नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात कोंडीत भर पडत आहे. या भागांत रस्ते, रिंगरोड, उड्डाणपूल, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग यंत्रणा, मेट्रोची प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी तातडीने उपाययोजना करा. कस्पटेवस्ती ते हिंजवडी फेज ३ पर्यंतचा रस्ता वेगळा केल्यास वाहतुकीने होणारी गर्दी कमी होईल, मात्र सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करावेत. म्हाळुंगे आयटी सीटीचा प्रलंबित प्रस्ताव त्वरित मंजूर करावा. रस्ते रूंदीकरणासाठी योग्य मोबदला देवून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून भूसंपादन करावे. हिंजवडी एलिवेटेड मार्गाचे काम सहा पदरी करून याबाबत १५ दिवसात निर्णय घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
सूर्या हॉस्पिटल ते माण गावठाण, म्हाळुंग ते हिंजवडी फेज एक, शनि मंदिर वाकड ते मरूनजी, नांदे ते माण या रस्त्यांची रूंदीकरणाच्या रूंदीकरणाच्या कामाला संबंधित यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. शिवाजीनगर ते हिंजवडी कॉरिडॉरचा आराखडा तयार करावा. वाकड-बालेवाडी भागात सार्वजनिक वाहतूक केंद्र उभारावे, यामुळे प्रवासी विभागले जावून गर्दी नियंत्रणात राहील. गर्दी वाढल्याने नागरिक रस्त्यावर येणार नाहीत, यासाठी फूटपाथचा विषयी दोन्ही मनपाने हाती घेवून मार्गी लावावा. पाटीलवस्ती ते बालेवाडीरोड येथील भूसंपादनाबाबत महिनाभरात काम करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुढच्या वर्षांपर्यंत अभ्यास करून योग्य प्रवाह होण्यासाठी नियोजन करा. योग्य त्याठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्याची कार्यवाही हाती घ्यावे. सर्व कामासाठी विभागीय आयुक्त यांनी समन्वय करून बैठका घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
हिंजवडी परिसरातील गर्दी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढली तर कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठी मेट्रोची कामेही त्वरित होणे आवश्यक आहे. मेट्रो स्टेशनची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.
मेट्रो लॅंडिंगमुळे रस्ता छोटा होईल, यासाठी एमआयडीसी, पीएमआरडीए, मेट्रो यांनी एकत्र समन्वयाने विषय मार्गी लावावा, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या.
पीएमआरडीएचे आयुक्त म्हसे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली
