उध्दव ठाकरेंच्या राजकारणाला राज ठाकरेंचा दणका, विजयी मेळाव्यातील राजकारणावरून खडे बोल

विशेष प्रतिनिधी

नाशिक : गलितगात्र झालेल्या आपल्या पक्षात जान आणण्यासाठी मनसेसोबत युती करण्यासाठी अगतिक शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलाच तडाखा दिला आहे. विजयी मेळावा मराठी पुरताच होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असे सांगून उद्धव ठाकरेंना राज यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने केलेल्या राजकारणावरूनही खडे बोल सुनावले आहेत. ( Raj Thackeray Slams Uddhav Thackerays Politics Sharp Attack OverMarathi Victory RallyPolitics)

राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली होती. यासाठी त्यांनी मोर्चाचा इशारा दिला होता. यातून राजकारण साधण्यासाठी उद्धव ठाकरे त्यामध्ये घुसले. आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच असे वक्तव्य खुद्द उद्धव ठाकरे यांनी केले. जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल असेही ते म्हणाले होते. युतीबाबत शिवसेना ठाकरे गटाने टाळी दिलेली असताना दुसरीकडे मात्र मनसे सावध पवित्रा घेत असल्याचे दिसून येत होते. आता यामध्ये राज ठाकरे यांनी युतीचा कोणताही विचार केला नव्हता असे स्पष्ट झाले आहे.
नाशिकमध्ये मनसेचे तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून या शिबिराला सुरुवात झाली असून मनसे प्रमुख राज ठाकरे हे शिबिरासाठी इगतपुरी येथे दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी अनौपचारिक गप्पांदरम्यान विजयी मेळाव्याबाबत भूमिका स्पष्ट केली.

मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्यावर होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले. तसेच नोव्हेंबर – डिसेंबर दरम्यान चित्र स्पष्ट होईल. त्यांनतर युती संदर्भातील निर्णय बघू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हिंदी सक्तीच्या जीआरबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, हिंदी सक्तीच्या बाबतील आताच्या सरकारने जीआर काढला होता. मागील सरकारने त्याचा अहवाल स्वीकारला होता, पण त्याचा जीआर काढला नव्हता, अंमलबजावणी केली नव्हती, असे सांगून उद्धव ठाकरे यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

मनसेने नेते आणि पदाधिकाऱ्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले असून, या शिबिराला आजपासून इगतपुरी येथे सुरुवात झाली आहे. हे शिबीर तीन दिवस चालणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः तीनही दिवस इगतपुरीत मुक्कामी राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या शिबिराला महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, अशी सूचक प्रतिक्रिया मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. यावर उद्धव ठाकरेंनीही भाष्य केले. यासंदर्भात बोलू नये, असे आदेश त्यांच्या पक्षप्रमुखाने दिले आहेत, असे म्हणत आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या, मग बोलू, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *