एअर इंडिया मागची साडेसाती संपेना, दिल्लीत विमानाला आग, सलग दुसऱ्या दिवशी अपघात

विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या दोन विमानांना सलग दोन दिवसांत तांत्रिक बिघाड व अपघातांचा फटका बसला आहे. मंगळवारी हाँगकाँगहून दिल्लीला आलेल्या ‘एअर इंडिया फ्लाइट AI 315’ च्या लँडिंगनंतर विमानाला आग लागली. सुदैवाने सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप आहेत. कालच एक दिवस आधी २१ जुलै रोजी कोचीहून मुंबईला येणारे ‘AI 2744’ विमान मुसळधार पावसामुळे धावपट्टीवरून घसरले होते. ( Air India’s Streak of Misfortune Continues: Fire in Delhi Aircraft, Second Incident in Two Days)

२२ जुलै रोजी हाँगकाँगहून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या AI 315 या फ्लाइटने सुरक्षित लँडिंग केले. प्रवासी उतरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच विमानाच्या Auxiliary Power Unit (APU) मध्ये आग लागली. APU ही यंत्रणा विमानाचे इंजिन बंद असतानाही काही यांत्रिक क्रिया सुरळीत चालू ठेवते.

एअर इंडियाच्या निवेदनानुसार, “AI 315 फ्लाइट हाँगकाँगहून दिल्लीला २२ जुलै २०२५ रोजी आली. गेटवर पोहोचून प्रवासी उतरू लागल्यावरच APU मध्ये आग लागली. ही यंत्रणा त्वरित बंद करण्यात आली. सिस्टीम डिझाइनप्रमाणे यंत्रणेनं आपोआप सुरक्षा प्रणाली सुरू केली.” या घटनेची माहिती तातडीने विमानतळ प्रशासनाला देण्यात आली असून, विमान तपासणीसाठी तात्काळ ग्राउंड करण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयालाही (DGCA) या प्रकाराची माहिती देण्यात आली आहे.

कालच कोचीहून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेली AI 2744 ही फ्लाइट मुसळधार पावसात लँडिंग करताना रनवेवरून घसरली. सकाळी ९:२७ वाजता झालेल्या या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विमान कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे की, “२१ जुलै रोजी कोचीहून मुंबईला येणारी फ्लाइट AI 2744 रनवेवर उतरत असताना जोरदार पावसामुळे घसरली. परंतु विमानाने सुरक्षितपणे टॅक्सी करत गेटपर्यंत पोहोचले आणि सर्व प्रवासी व कर्मचारी सुरक्षित उतरले.”

मागील काही महिन्यांपासून एअर इंडियाच्या विविध फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड, अति उशीर आणि यांत्रिक त्रुटी यांचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, कोलकाता यांसारख्या प्रमुख विमानतळांवरील घटना विशेषतः चिंतेची बाब बनली आहे.

नुकत्याच मुंबईत घडलेल्या घटनेनंतर नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, DGCA ने या घटनांची सखोल चौकशी करावी आणि सार्वजनिक प्रवास सुरक्षित राहील याची हमी द्यावी, अशी मागणी वाढत आहे.

या दोनही घटनांनंतर एअर इंडियाने स्पष्ट केले आहे की, प्रवासी व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता हेच आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले असून, घटनांची तपासणी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *