भारताच्या लष्करी ताकदीची विद्यार्थ्यांना होणार ओळख, ऑपरेशन सिंदूर’चा अभ्यासक्रमात समावेश

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मधील कारवाईवर आधारित दोन विशेष अभ्यास मॉड्यूल्स तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या विशेष धड्यांद्वारे विद्यार्थ्यांना भारताच्या लष्करी ताकदीची ओळख करून देण्याचा उद्देश आहे. ( Students will be introduced to Indias military might Operation Sindoor will be included in the curriculum)

ही दोन्ही अभ्यास मॉड्यूल्स लवकरच प्रकाशित करण्यात येणार असून, इयत्ता ३ ते ८ साठी एक मॉड्यूल आणि इयत्ता ९ ते १२ साठी दुसरे मॉड्यूल असे दोन भागात त्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे. “या धड्यांमध्ये भारत आणि भारतीय सशस्त्र दलांच्या यशोगाथा ८ ते १० पानी स्वरूपात मांडल्या जातील. विद्यार्थ्यांना भारताच्या लष्करी क्षमतेची जाणीव करून देणे आणि पाकिस्तानवर झालेल्या निर्णायक विजयाची माहिती देणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

एनसीईआरटीकडून नियमित अभ्यास पुस्तकांबरोबरच आधुनिक घटनांवर आधारित विशिष्ट विषयांवर ‘विशेष मॉड्यूल्स’ प्रकाशित केली जातात. जून २०२५ पर्यंत ‘विकसित भारत’, ‘नारीशक्ती वंदन’, ‘G20’, ‘चांद्रयान उत्सव’ यासारख्या १६ विशेष मॉड्यूल्स प्रकाशित करण्यात आले आहेत.

“पुढील काही महिन्यांत ‘Mission LiFE (LiFEstyle For Environment)’, फाळणीचे भीषण परिणाम, भारताचा अंतराळ महासत्ता म्हणून झालेला उदय – चांद्रयानपासून आदित्य एल१ ते शुभांशु शुक्लाचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंतचा प्रवास यावरही विशेष धडे प्रकाशित करण्यात येणार आहेत,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

७ मेच्या पहाटे भारताने पहालगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकिस्तान-अधिकृत काश्मीरमधील नऊ दहशतवादी व लष्करी तळांवर हल्ला चढवला. यामुळे दोन्ही देशांमध्ये चार दिवसांची लष्करी टक्कर निर्माण झाली. यात फायटर जेट्स, क्षेपणास्त्रे, ड्रोन, लाँग रेंज हत्यारे आणि तोफांचा वापर झाला. शेवटी १० मे रोजी दोन्ही बाजूंनी लष्करी कारवाया थांबवण्याचे मान्य केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जून महिन्यात सांगितले की, ऑपरेशन सिंदूर ही २०१६ मधील सर्जिकल स्ट्राईक आणि २०१९ मधील बालाकोट हवाई हल्ल्याचीच पुढची पायरी होती. ही कारवाई अशा पद्धतीने करण्यात आली की पाकिस्तानला थेट युद्धबंदीची विनंती करावी लागली. यामधून भारताचा दहशतवादाविरोधातील ठाम निर्धार स्पष्ट होतो.

दरम्यान, नुकत्याच प्रकाशित झालेल्या एनसीईआरटीच्या इयत्ता ८ वीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शाइस्ताखानच्या छावणीवर रात्री केलेल्या हल्ल्याची तुलना आधुनिक सर्जिकल स्ट्राईकशी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *