विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममधील पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यासाठी ऑपरेशन महादेव राबवण्यात आले.
( Three terrorists who carried out terrorist attack on tourists killed)
जम्मू काश्मीरच्या दारामधील लिडवास परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी जोरदार चकमक झाली. यात तीन दहशतवादी ठार झाले. या संदर्भात सैन्यदलाच्या चिनार कॉर्पकडून एक्स समाज माध्यमावर ट्विट करण्यात आले आहे.
हे तिन्ही दहशतवादी टीआरएफचे असल्याचे श्रीनगरचे एसएसपी जीव्ही संदीप चक्रवर्ती यांनी सांगितले आहे. त्याचवेळी हे दहशतवादी पहलगाम हल्ल्यातील असू शकतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे विरोधकांच्या मागणीनंतर लोकसभा आणि राज्यसभेत 16 तासांची चर्चा करण्याची तयारी सरकारने दाखवली होती. त्याप्रमाणे सोमवारी लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील चारही दहशतवादी पळून गेले होते. त्यांचा शोध लागत नव्हता.
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता. 26 पर्यटकांचा धर्म विचारून हत्या करण्यात आली होती. यात 25 भारतीय आणि एक नेपाळी होता. त्यानंतर 15 दिवसांनी सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते. पहलगाम दहशवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड हाशिम मुसा यात मारला गेल्याचे सांगण्यात येते.
पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने आतापर्यंत अनेक दहशतवाद्यांना ठार मारत दहशतवाद्यांचे कंबरडं मोडलं आहे. मात्र अद्यापहि पाकड्यांची खोड जिरली नसल्याचे पुढे आले आहे. अशातच कंठस्नान घातलेले तिघा पैकी दोन अतिरेकी पहलगाम हल्ल्यातील संशयित असल्याची माहिती पुढे आली आहे.
सेनेने महादेव टेकडीवर एक छावणी उभारली आहे, ज्याद्वारे या भागातील हालचालींवर लक्ष ठेवले जाते. दहशतवादी मुसाच्या हालचाली येथे बऱ्याच काळापूर्वी दिसल्या होत्या. म्हणूनच शोध मोहीम सुरू होती. सैन्यासोबत जम्मू-काश्मीर पोलिसही या कारवाईत सहभागी होते. सैन्याने ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये ज्या ठिकाणी चकमक झाली ती जागा टेकडीवर आहे.
दहशतवाद्यांनी महादेव टेकडीच्या परिसरात तंबू उभारले होते आणि ते या ठिकाणी राहत होते. सध्या सैन्य हे दहशतवादी कुठून आले आणि ते कोणत्या संघटनेशी संबंधित होते याचा शोध घेत आहे.
