राहुल गांधींचे आरोप खोटे, निराधार आणि अतिशय बेजबाबदार, निवडणूक आयोगाकडून जोरदार प्रत्युत्तर

विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आरोप “खोटे, निराधार आणि अतिशय बेजबाबदार” असल्याचा पलटवार निवडणूक आयोगाने केला आहे. देशातील निवडणूक प्रक्रियेवर आणि निवडणूक आयोगावर (ECI) मोठे आरोप करत “मतचोरी” होत असल्याचा गंभीर दावा राहुल गांधी यांनी केला आहे . ( Rahul Gandhis allegations are false baseless and highly irresponsible Election Commission gives strong response)

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, “राहुल गांधी यांनी माध्यमांतून रोज निवडणूक आयोगावर आरोप करत धमक्या दिल्या तरीही, त्यांनी आजपर्यंत आयोगाशी कोणताही अधिकृत संपर्क साधलेला नाही आणि कोणतीही तक्रारही दाखल केलेली नाही.”

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, १२ जून २०२५ रोजी राहुल गांधी यांना मेल आणि पत्राद्वारे संपर्क साधून त्यांच्या आरोपांविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र, राहुल गांधी यांनी त्या पत्रांना किंवा मेलला कोणतेही उत्तर दिले नाही.

प्रमुख निवडणूक आयुक्तांनी म्हटले, “राहुल गांधी यांनी केवळ आरोपच केले नाहीत, तर आता ते आयोगाच्या अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतरही शोधून शिक्षा करू असे धमकीजनक विधान करत आहेत, हे अत्यंत निषेधार्ह आहे. निवडणूक आयोगाचे सर्व अधिकारी पारदर्शक आणि निष्पक्षपणे काम करत असून, अशा बेजबाबदार विधानांकडे दुर्लक्ष करावे, असे आम्ही सर्व अधिकाऱ्यांना सांगितले आहे.”

राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर त्यांच्या पक्षाच्या एकाही उमेदवाराने कोणतीही अधिकृत तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल केलेली नाही. निवडणूक निकालानंतर एकूण १० याचिका दाखल झाल्या होत्या, परंतु त्या काँग्रेस उमेदवारांकडून नव्हत्या, असे आयोगाने म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसदेसमोर प्रसारमाध्यमांशी बोलताना दावा केला की, “मतचोरीचे आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. जे कोणी निवडणूक आयोगात या कारवायांमध्ये सहभागी आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही . निवृत्तीनंतरसुद्धा शोधून कारवाई करू.”महाराष्ट्र निवडणुकांमध्ये एक कोटी नवीन मतदार यादीत अचानक कसे आले? यावर आम्ही सहा महिने स्वतंत्रपणे तपास केला आणि जो तपशील समोर आला, तो ‘ऍटॉम बॉम्ब’ आहे. एकदा तो फुटला, की आयोग कुठेही लपून राहू शकणार नाही.

आमचे काम निष्पक्ष व पारदर्शक राहील आणि कोणत्याही राजकीय दबावाला आम्ही बळी पडणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *