मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट, मनोज जरांगे यांना आंदोलनच करता येणार नसल्याचा गुणरत्न सदावर्ते यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उच्च न्यायालयात जेव्हा एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असते त्याविरुद्ध अशा पद्धतीने आंदोलन करणे हे अयोग्य आहे आणि चुकीचे आहे. हा न्यायालयाचा अपमान केल्यासारखे आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाच्या मागणीवर आंदोलन करताच येणार नाही असा दावा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. ( Gunaratna Sadavarte claims that the Maratha reservation issue has been referred to the court Manoj Jarange cannot protest)

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. परंतु, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांचा विरोध करत त्यांच्यावर आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सदावर्ते म्हणाले, आझाद मैदानात आंदोलन करण्याची मनोज जरांगे यांनी परवानगी घेतली आहे का? आत्ता मी पोलिस अधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी स्पष्टपणे मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या बाबतीत व उपोषणाच्या बाबतीत कोणतीही परवानगी दिलेली नाही असे सांगितले आहे. जरांगे ज्या पद्धतीने बोलत आहेत, ज्या खालच्या भाषेत बोलत आहेत, प्रत्येकाला कोणतीही प्रतिष्ठा नाही असे ते वर्तन करत आहेत. हे ठरवून केले जात आहे म्हणून आम्ही काल संध्याकाळीच पोलिस महासंचालकांना तसेच अतिरिक्त सचिव तसेच मुंबईच्या पोलिस आयुक्तांना आम्ही तक्रारी दिल्या आहेत.

मनोज जरांगे यांना हे आंदोलन करताच येणार नाही. उच्च न्यायालयात जेव्हा एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असते त्याविरुद्ध अशा पद्धतीने आंदोलन करणे हे अयोग्य आहे आणि चुकीचे आहे. हा न्यायालयाचा अपमान केल्यासारखे आहे. आम्ही पोलिसांना मागणी केली की त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल करावा त्याचसोबत जरांगे यांच्यावर एफआयआर दाखल केला पाहिजे, अशी मागणी केली.

सदावर्ते यांनी गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, क्षमतेपेक्षा जास्त लोकांचा लोंढा मुंबईत येऊन अडथळे निर्माण होतील आणि जीडीपीवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *