विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते पवन खेऱा यांच्यावर दोन मतदारसंघांत नाव नोंदवले असल्याचा आरोप होत असून, निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. नवी दिल्ली जिल्हा निवडणूक कार्यालयाने मतदारयादीत खेऱा यांचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी आढळल्याचे नमूद केले असून, लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत त्यांना 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
( Election Commission issues notice to Pawan Khera allegation of registration in two constituencies)
हा प्रकार भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी उघडकीस आणला. त्यांनी खेऱा यांच्याकडे दोन सक्रीय मतदार ओळखपत्रे असल्याचा दावा केला आहे. यामध्ये एक जंगपूरा मतदारसंघातील (EPIC क्रमांक XHC1992338) आणि दुसरे नवी दिल्ली मतदारसंघातील (EPIC क्रमांक SJE0755967) असे नमूद केले आहे. मालवीय यांनी काँग्रेसवर टीका करत “काँग्रेस म्हणजे मूळची ‘व्होट चोर’ पार्टी” असा आरोप केला. राहुल गांधी “व्होट चोरी”बाबत घोषणा देतात, पण त्यांचे निकटचे सहकारीच दुहेरी नोंदणी करून ठेवतात, असे ते म्हणाले.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना पवन खेऱा यांनी जबाबदारी निवडणूक आयोगावर ढकलली. त्यांनी सांगितले की, 2016 साली नवी दिल्लीहून स्थलांतर करताना त्यांनी आपले नाव वगळण्याकरिता अर्ज केला होता. “माझ्या नावाने नेमके कोण मतदान करत आहे? मला त्याचे CCTV फुटेज दाखवावे,” अशी मागणी खेऱा यांनी केली.
हा वाद काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपच्या कथित “व्होट चोरी”चा पर्दाफाश करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर केवळ एका दिवसात उफाळून आला आहे. त्यामुळे भाजप-काँग्रेसमधील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली आहे.
