विशेष प्रतिनिधी
मुंबई : निवडणुका जाहीर झाल्या, मतदानही झाले, पण निकाल इतक्या वेळाने लागणार आहे. कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे निकाल पुढे ढकलला जाणे लोकशाहीच्या तरी पद्धतीला अनुरूप नाही. माझ्या इतक्या वर्षांच्या राजकारणाच्या अनुभवात हा प्रकार प्रथमच पाहतोय, असा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
( Devendra Fadnavis Expresses AngerCalls Result Delay Undemocratic)
राज्यातील काही नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकींमध्ये प्रलंबित प्रक्रियेमुळे उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 20 नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकींच्या निकालाबाबत न्यायालयाकडून सूचना मिळाल्या होत्या. याचिकाकारांनी निवडणुकीचा निकाल सर्व ठिकाणी एकाच दिवशी निकाल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे, खंडपीठाने सर्व ठिकाणच्या निवडणुकींचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वातावरणात चिंता निर्माण झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की , मी निवडणूक आयोगावर आरोप करणार नाही, पण ज्यावेळी नियमांचा चुकीचा अर्थ लावला जातो, तेव्हा प्रक्रियेवर प्रश्न येते. त्यांनी सांगितले की, जिथे सर्व काही योग्य पद्धतीने पार पडले आहे, तिथेही निकाल पुढे ढकलला गेला हे न्यायालयाने केलेले असून, निवडणूक आयोगाने पुढच्या निवडणुका योजताना या चुका टाळाव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
राज्य निवडणूक आयोगाचा निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय अतिशय चुकीचा असल्याचा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला होता. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला. आयोग कोणता कायदा काढतंय किंवा तो कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही. पण एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून निवडणूकच पुढे ढकलायची हे अतिशय चुकीचे आहे, असे ते म्हणाले होते.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील मतदान केंद्र क्रमांक 3 येथे मंगळवार सकाळी झालेल्या घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या केंद्रावर पक्षाचे आमदार संतोष बांगर मतदानासाठी आले, परंतु त्यांनी प्रत्यक्ष मतदान करत असलेल्या एका महिला मतदाराला ईव्हीएमवर मतदान करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी घोषणाबाजी करत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, एकनाथ शिंदे आगे बढो… असा घोषणा देखील मतदान केंद्रात दिला. त्याच वेळी बांगर यांनी मोबाइल फोनचा वापर देखील केला. या सर्व वर्तनामुळे मतदान केंद्रात शांततेचा भंग झाला आणि हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, लोकप्रतिनिधींनी लोकशाहीचा आदर ठेवला पाहिजे; मतदान केंद्रावर असे वर्तन करण्यास हरकत आहे. त्यांनी मतदार आणि मतदान केंद्राचा सन्मान राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सध्या हा प्रकार निवडणूक अधिकाऱ्यांकडे तपासासाठी पाठवण्यात आला असून जर नियमभंग पुष्टी झाल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
