नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. कमानी सभागृहात झालेल्या सोहळ्यात साहित्य अकादमी पुरस्कार -2023 चा सादरीकरण सोहळा हे महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले. ओडिसाच्या प्रख्यात साहित्यिक व प्रमुख पाहुण्या प्रतिभा राय यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्ष कुसुम शर्मा तसेच सचिव, के. श्रीनिवासराव मंचावर उपस्थित होते.अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 24 प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कृष्णात खोत यांच्या लेखन कार्याविषयी
कृष्णात खोत यांना मराठी कादंबरी ‘रिंगाण’ करिता साहित्य अकादमीतर्फे गौरविण्यात आले. साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, शाल आणि रुपये एक लाख रोख रक्कम असे आहे. मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवितात.
कृष्णात खोत हे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदेश समूहनिष्ठ कादंबरी लेखनाने ‘कादंबरीकार कृष्णात खोत’ म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शतकारंभी कृष्णात खोत यांनी त्यांच्या लेखन कार्याला सुरूवात केली आणि मराठीत लक्षणीय ठराव्यात, अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. ‘गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४), ‘रिंगाण’ (२०१८) या त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या असून, या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय ‘नांगरल्याविन भुई’ हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. गावसंस्कृती आणि बदलते खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांना विविध पुरस्कारांनी आणि सन्मानांनी नावाजले गेले आहे. यशवंतराव चव्हाण राज्य साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) पुरस्कार, वि. स. खांडेकर पुरस्कार, बाबूराव बागूल शब्द पुरस्कार, भैरूरतन दमानी साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
रिंगाण या कादंबरीविषयी
‘रिंगाण’ या कादंबरीला मराठी भाषा करिता साहित्य अकादमी पुरस्कार 2023 साठी कृष्णात खोत यांना पुरस्कार प्रदान झाला. ‘रिंगाण’ कादंबरीत जंगलात राहणाऱ्या समुदायाच्या विस्थापित आयुष्याचे चित्रण आहे आणि या समुदायाला धरण बांधण्याच्या कामासाठी एका प्रतिकूल समुदायामध्ये पुनर्स्थापित करण्यात आलेले आहे. मानव आणि निसर्गातील नातेसंबंधांच्या इतिहासाचे हे निवेदन असून, स्व-रक्षणासाठी मानवाने निसर्गाशी केलेल्या संघर्षाचा हा वास्तववादी इतिहास आहे. या कादंबरीतील नायक, देवप्पाचा वेदनादायी शोध मानवाच्या निसर्गाशी असलेल्या नात्यातील दृढता आणि संघर्ष रेखाटतो. मानवाच्या वर्तणुकीमुळे आणि ताकदीमुळे कशी पर्यावरणीय आणि सामाजिक हानी झालेली आहे याचे अत्यंत महत्वपूर्ण विधान या कादंबरीत करण्यात आलेले आहे. भारतीय कादंबरी प्रकाराला मराठीतील ‘रिंगाण’ हे महत्वपूर्ण योगदान आहे. माणूस आणि पाळीव प्राणी यांच्यातील संबंधांचा एक अनोखा अनुबंध या कादंबरीतून अनुभवायला मिळतो.
