विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रात मराठी-अमराठी वाद पुन्हा एकदा पेटला असतानाच जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुकतेश्वरानंद यांनी वादग्रस्त विधान करत राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. “ठाकरे कुटुंब मूळचे महाराष्ट्राचे नसून मगध प्रदेशातून आलेले आहे. सुरुवातीला त्यांना मराठी येत नव्हती, तरीसुद्धा महाराष्ट्राने त्यांना स्वीकारले. आज तेच लोक इतरांवर मराठी न येण्याचा ठपका ठेवत आहेत, हे दुर्दैवी आहे,” असे ते म्हणाले.
( Thackeray came from outsideMaharashtra accepted him even though he was not Marathi Today he is the one fighting for Marathi claims Shankaracharya Swami Avimukateswaranand)
गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना स्वामी अविमुकतेश्वरानंद यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर परखड टीका केली. “सार्वजनिक ठिकाणी उभे राहून जर कोणी भाषेच्या नावाखाली इतरांना मारहाण करण्यासाठी आवाहन करत असेल, तर याचा अर्थ देशातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आहे. अशा प्रकारचा अराजकता निर्माण करणारा प्रचार हे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना विरोध करणारे आहे.
मराठीबद्दल आपुलकी व्यक्त करताना स्वामी म्हणाले, “मी दोन महिने मुंबईत राहणार आहे. मला मराठी शिकायची आहे. ठाकरे बंधूंनी जर खरंच मराठीप्रेमी असतील, तर त्यांनी मला मराठी शिकवावी. मी ते शिकून देशभरात मराठीचा प्रचार करीन. महाराष्ट्रात संतांची शिकवण, तुकोबा, ज्ञानेश्वर, नामदेव यांचं तत्वज्ञान हे मराठीत आहे. ते समजून घेण्यासाठी मराठी शिकणं आवश्यक आहे. मी ते शिकायला तयार आहे.”
स्वामी अविमुकतेश्वरानंद यांनी यावेळी एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयाचेही कौतुक केले. “मागील सरकारने गाईंना ‘राज्यमाता’ म्हणून घोषित करत त्यांचा सन्मान केला होता, मात्र सध्याच्या सरकारने या निर्णयासाठी आवश्यक कोणताही प्रोटोकॉल तयार केलेला नाही. जनावरांबाबतचा आदरही नष्ट होत चालला आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
