रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील पारस गावात समर्थ बाबूजी महाराज संस्थान मंदिराचे छत कोसळले होते. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेतील मृतांचा कुटुंबियांना आर्थिक मदत करणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते मुंबईत माध्यामांशी बोलत होते.
माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, घटना वेदनादायी आहे. या घटनेतील जखमींना चांगल्या रुग्णालयात उपचार मिळावेत, यासाटी सूचना दिल्या आहेत. त्यांच्या उपचारांचा खर्च राज्य सरकारच्या वतीने करण्यात येईल. तसचे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून कुटुंबियांना मदत देण्यात येईल. तसेच या घटनेची चौकशी करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सदर घटनेत मंदिराला लागून असलेले मोठे कडुलिंबाचे झाड अचानक उन्मळून टिनशेडवर कोसळले. त्यामुळे शेडखाली असलेले ४० ते ५० जण दबले गेले होते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पोहोचत बचाव कार्य सुरू केले. तसेच जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
