महाराष्ट्राच्या सीमाप्रश्नावर कर्नाटक विधानसभेने एकमताने ठराव मंजूर केला. यामध्ये राज्याच्या हिताचे रक्षण करण्याचा ठराव घेण्यात आला. महाराष्ट्राने निर्माण केलेल्या सीमावादाचा निषेध करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. कोणत्याही मंत्र्याने याप्रश्नी विधाने करत राहिल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे ठरावात नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभेत असा कोणताही प्रस्ताव ठेवण्यात आला नाही. त्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्र विधानसभेचा कर्नाटक पेक्षा प्रभावी प्रस्ताव मांडायचा होता. मात्र विधानसभेच्या विद्यमान सदस्या मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यामुळे त्यांचा शोक प्रस्ताव आज आहे. शोक प्रस्ताव असताना आपण दुसरं कुठलेही काम आपण करत नाही. त्यामुळे सोमवारी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद यासंदर्भातील प्रस्ताव आणायचा आहे. कर्नाटकपेक्षा १० पट प्रभावी आणि विस्तृत प्रस्ताव आपला असणार आहे.
केंद्रीय गृह मंत्र्यांसमोर दोन्ही राज्यांच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत जे ठरलं त्या विरोधात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वर्तणूक केली. हे अतिशय चुकीचे आहे. केंद्रीय गृहमंत्र्यासमोर ठरलेल्या गोष्टी कर्नाटक सरकार पाळत नसेल तर हे केंद्राच्या सुचनांचे उल्लंघन आहे. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे कुणाचे आहेत. हे कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या कृतीवरून स्पष्ट होते.असे शंभूराज देसाई म्हणाले.
