राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असतानाच राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आबंडेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती होण्याची चिन्हे दिसत होती. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत होती. अशातच एक मोठी घडामोड घडली ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली.
त्यामुळे आता वंचितची युती नक्की कुणाशी होणार याविषयी चांगलीच चर्चा रंगू लागली आहेत. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धवजी सोबत कुणीही राहू शकत नाहीत. त्यांचे आमदार त्यांच्यासोबत नाहीत. जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाहीत, ते प्रकाश आंबेडकर यांना कसे काय सांभाळतील? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर विद्वान आहेत, त्यांना सगळं समजत. उद्धवजी सोन्याच्या चमच्याने बदाम खाऊन मोठे झालेले नेते आहेत. उद्धवजींच्या रक्तातच युती टिकवणे नाही. ते कुणाचाच सन्मान ठेऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर उद्धव यांच्यासोबत जाणार नाहीत, असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिलं आहे. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, येत्या काही दिवसात भाजपामध्ये अनेक मोठे-मोठे नेते येणार आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे पूर्ण पक्ष रिकामे होणार आहेत. शिवसेनेचे अनेक लोक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. ही सगळी लोक भाजपामध्ये येतील यात बरीच मोठे-मोठी नावं आहेत. फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचं आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील आणि महाराष्ट्राला धक्का बसेल असे प्रवेश होतील असही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. लातूरहून अमित देशमुख भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू आहेत. यासंबधी प्रश्नावर उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी इतर पक्षांच्या प्रवेशावर बोलले आहेत.
