नवी दिल्ली : राहुल गांधी लंडनमध्ये जे बोलले ते पूर्णपणे खोटे, निराधार आहे. आजपर्यंत अशा गोष्टी कोणाकडून ऐकल्या नाहीत अशा शब्दांत राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी ब्रिटनच्या संसदेत काही खासदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय संसदेतील विरोधी नेत्यांचे माइक बंद केले जात असल्याचा आरोप केला. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी नाराजी व्यक्त केली असून राहुल गांधींचा हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. हरिवंश नारायण सिंह म्हणाले की, ‘राहुल गांधी लंडनमध्ये जे बोलले ते पूर्णपणे खोटे, निराधार आहे. मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो की मी आजपर्यंत अशा गोष्टी कोणाकडून ऐकल्या नाहीत. हरिवंश नारायण सिंह म्हणाले की, 1952 पासून ज्या परंपरा आणि व्यवस्था चालत होत्या, त्या आजही त्याच पद्धतीने चालत आहेत.
भारतीय वंशाचे खासदार वीरेंद्र शर्मा यांनी ब्रिटनच्या संसदेत राहुल गांधींसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी वापरत असलेला मायक्रोफोन सदोष होता. यावर राहुल गांधी म्हणाले की, भारतातील आमचे माइक खराब नाहीत, ते काम करत आहेत, पण तुम्ही ते चालू करू शकत नाही. मी भारतीय संसदेत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे माझ्यासोबत अनेकदा घडले. विरोधी पक्षाला दडपले जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले की, ‘नोटाबंदी ही सरकारची चूक होती आणि आम्हाला त्यावर चर्चा करायची होती, पण त्यावर चर्चा करू देण्यात आली नाही. आम्हाला जीएसटीच्या विरोधात आवाज उठवायचा होता पण तसे होऊ दिले नाही. राहुल म्हणाले की, पूर्वी संसदेत जोरदार वादविवाद व्हायचे पण आता तसे राहिले नाही.
