गड किल्ल्यांवर मद्यपान केल्यास तीन महिने शिक्षा आणि दहा हजारांचा दंड – सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची पराक्रमाचे साक्षीदार आहेत. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधणारे अनेक जण या गड किल्ल्यांना भेट देतात. अनेक गड किल्ल्यांची पडझड झाली आहे. तर, या गड किल्ल्यांना भेट देणारे काही समाजकंटक येथे मद्य प्राशन करुन येथे धिंगाणा घालतात. यामुळे इतिहास प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जाते. गड किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांना कडक कारवाई करण्याचा मोठा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. गड किल्ल्यांवर मद्यापान करताना आढळल्यास थेट तुरुंगात रवानगी होणार आहे.

महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर आता मद्यपान केल्यास तीन महिने तुरूंगाची वारी होऊ शकते. कारण, तसा प्रस्ताव राज्य सरकार मंजुरीसाठी पाठवणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिलीय. गड किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्या फक्त तीन महिन्यांचा तुरूंगवासच नाही, तर सोबत दहा हजारांचा दंड ठोठावण्याचीही तयारी राज्य सरकारने केलीय. त्याचसोबत, प्रत्येक गड किल्ल्यावर हेरिटेज मार्शल नेमण्याचीही घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय. दरम्यान, या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास महाराष्ट्राच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा असणाऱ्या आणि ज्यांच्या अंगाखांद्यांवर इतिहास घडला, त्या गड किल्ल्यांवर मद्यपान करून त्याचं पावित्र्य घालवणाऱ्यांना चांगलाच चाप बसेल अशी आशा निर्माण झालीय.