ईडीने बुधवारी मुंबईत 15 ठिकाणी छापे टाकले आहेत यामध्ये संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचाही समावेश आहे ठाकरे गटाने गद्दार दिन साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईत मोठी कारवाई केली आहे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह पालिकेच्या अधिकाऱ्यांवर एकापाठोपाठ एक छापे टाकण्यात येत आहे.सध्या राज्यात ईडीचे धाड सत्र सुरु आहे. ईडी राज्यातील विरोधीपक्षातील नेते आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करत आहे. यामुळे राज्यातील विरोधी पक्षाचे नेते त्यावर बोलत आहेत. या विरोधीपक्षाच्या नेत्यांना शिवसेना प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी उत्तर देत म्हंटले आहे कि कालपासून महाराष्ट्र काही विरोधी पक्षाचे नेते खळबळजनक वक्तव्य करत आहेत. ईडीची धाड एका दिवसात पडत नाही. विरोधकांना वाटतं धाडी आम्ही टाकल्या. जर भष्टाचार केला नसेल, काही काळबेरं केलं नसेल तर घाबरायचं कशाला असा सवाल शिरसाटांनी विरोधकांना केला. ते आज छ. संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलत होते.
आमदार संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले ईडीच्या धाडी एखाद्या राजकीय पक्षाने सांगितल्या म्हणून पडतात असं नाही, आतापर्यंत शरद पवार, राज ठाकरे, जयंत पाटील यांनाही नोटीस आल्या होत्या.तुम्ही काहीतरी काळबेरं केलंय म्हणून तुम्हाला याची भीती वाटत आहे.
राज्यातील सर्वच पक्षातील नेते सध्या मोठ्या प्रमाणात तेलंगणातील केसीआर या पक्षात प्रवेश करत आहेत. यावर बोलताना आमदार संजय शिरसाट म्हणाले मी केसीआर चे स्वागत करतो, जो वारकऱ्यांचा सन्मान करेल त्याच आम्ही स्वागत करु, मग ते ममता असो की केजरीवाल जे वारकऱ्यांचा सन्मान करतील आम्ही सन्मान करतो. हा वारकऱ्यांचा सन्मान आहे तुम्ही त्याला राजकीय रंग देऊ नका.आम्हालाही वाटल नव्हत केसीआर यांचे इतके मोठे मेळावे होतील पण त्यांनी घेतले. हजारो लोक केसीआर यांनी परराज्यातून घेऊन येऊन मोठ्या संख्येत जमा करणं याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे.
तसेच मागील एका वर्षात कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे कोणत्याना कोणत्या कारणावरून अडचणीत आले आहेत. आताच त्यांच्या लोकांनी सरकारी कर्मचारी म्हणून बियाणांच्या दुकानावर धाडी टाकल्या. त्यामुळे त्यांच्या अडचणी अजून वाढल्या अब्दुल सत्तार यांच्या बद्दल बोलताना शिरसाट म्हणतात अब्दुल सत्तार यांच्याविरोधात येणाऱ्या तक्रारींवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्यांना समज देतील.
