उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोलं सुनावले

विधान परिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मात्र, नव्या मंत्र्यांची ओळख करुन दिल्याशिवाय कामकाज सुरु होणार नसल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांची ओळख सभागृहाला करुन दिली. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सभागृहामध्ये सभापतीपदावर आक्षेप नोंदवला.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे दोन्ही गट समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. काही आमदार सत्ताधारी बाकांवर तर काही विरोधी बाकांवर बसले होते.अजित पवारांच्या भूमिकेमुळे विधिमंडळातील राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले आहे. त्यातच उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या सभागृहात आजच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

जयंत पाटील म्हणाले, या सभागृहातील अधिकार व्यक्ती आहे जे सभागृह चालवताना विधान परिषदेच्या सभापतीपदावर बसलेल्या व्यक्तीचा कोणताही पक्ष नसतो. त्यांचे पक्ष सदस्यत्व जाते. माझ्याकडे संसदेचे सर्व नियम आहेत. त्यावर सत्ताधारी बाकांवर कोर्टात जा असं म्हटलं. यावर जयंत पाटील म्हणाले, तुमच्यासाठी कोर्ट सोप्प आहे.जयंत पाटील बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाँईट ऑफ ऑर्डर उपस्थित केला. फडणवीस म्हणाले, असं कधीही कुठल्याही वेळी सभापतींवर आक्षेप घेता येत नाही. त्याचे काही नियम आहेत. जर नियमांत बसत असेल तर आक्षेप घेता येतो. हा आक्षेप कुठल्याही नियमांत बसत नाही. शोक प्रस्ताव असताना नियमाबाह्य कामकाज चालवता येणार नाही. विनानोटीस असा आक्षेप घेता येणार नाही, हा माझा पाँईंट ऑफ ऑर्डर आहे. अशा प्रकारे सभागृहाला वेठीस धरता येणार नसल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मी लोकशाहीवादी व्यक्ती आहे

विधान परिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळात गोंधळ उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आपली बाजू मांडताना विरोधकांना चांगलेच खडसावले.त्या म्हणाल्या, मी लोकशाहीवादी व्यक्ती आहे. गोंगाट करतायेत जे काही करायचे त्याआधी नियमांवर चर्चा करु.आजचे कामकाज होऊ द्या. ज्यावेळी शोक प्रस्ताव असतो त्यावेळी दुसरा कोणताही विषय घेता येत नाही.एकदा चर्चेला सुरुवात झाली तर दोन्ही बाजूंच्या नेत्यांना बोलायला द्यावे लागेल.गटनेत्यांच्या बैठकीला उपस्थित असता तर तुम्हाला निर्धारित वेळ ठरवून दिली असती.माझ्या विरोधात अविश्वास असेल तर मी माझ्या अधिकारात तुम्हाला तसा ठराव सभागृहात मांडण्याची अनुमती देऊ शकते. मात्र, गटनेत्यांच्या बैठकीत तुम्ही आला नाही, चर्चा केली नाही. उद्या याला वेळ देण्याबाबत चर्चा करु. आता मी काही ऐकून घेणार नाही. मी चर्चेला वेळ देते मात्र अशाप्रकारे सभागृह चालवू शकत नाही. हे सभागृह नियामाने चालेल, अशा शब्दात निलम गोऱ्हे यांनी विरोधकांना सुनावले.