राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांना उमेदवारी दिली. मात्र, आधीच राज्यसभेचे सदस्य असलेल्या प्रफुल पटेलांच्या रिक्त झालेल्या जागेवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्वतः प्रफुल पटेल यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया देताना काही गोष्टी गुलदस्त्यातच बऱ्या असे म्हटले आहे. हा इशारा कोणाला अशी चर्चा आता रंगली आहे.
राज्यसभेची उमेदवारी घोषित झाल्यानंतर प्रफुल पटेल यांनी आज मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 2027 पर्यंत पटेल यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ बाकी असतानाही तांत्रिक कारण पुढे करत पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
प्रफुल पटेल म्हणाले, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. हा निकाल आमच्याच बाजून लागेल यासाठी मी प्रार्थना करतो. निकालाची वाट आम्ही पाहू पण निकाल आमच्याच बाजूने यावा यासाठी प्रार्थना करत आहे. आमचे नेते अजित पवार, सुनील तटकरे,छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार आज मी उमेदवारी अर्ज भरला आहे. माझी खासदारकीची मुदत शिल्लक असताना मी परत अर्ज भरला आहे. आम्ही राजकीय जीवनात काम करत असताना आम्हाला काही घडामोडी कराव्या लागत आहे. खूप लोक आमच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत. येणाऱ्या काळात तुम्हाला कळेल की मी असे का केलं आहे. रिक्त असणारी जागा आम्हालाच मिळेल. यात काही शंका नाही, असेही पटेल म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या 400 पेक्षा अधिक जागा निवडून येणार आहेत आणि महाराष्ट्रात आम्ही 45 पेक्षा जास्त जागा जिंकू.
