पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. शनिवारी सकाळी नरेंद्र मोदी यांची नांदेडमध्ये सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण झाले. या भाषणाची चर्चा चांगलीच रंगली. त्यांनी संपूर्ण भाषण हिंदीत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. परंतु एकनाथ शिंदे यांनी हिंदीतून भाषण केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक करत पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांना जनता स्वप्नातही पंतप्रधान करणार नाही, असा टोला त्यांनी लागवला.
यावेळी जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त करत इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.”देशात पहिल्या टप्याचे मतदान झाले आहे. त्यामुळे मतदान करणाऱ्या आणि पहिल्या वेळी मतदान करणाऱ्यांचे आभार मानतो. पहिल्या टप्प्यात एनडीएला एकातर्फी मतदान झालं आहे. मात्र कोणालाही मतदान करा पण मतदान जरूर करा. सध्या उष्णता खूप आहे, लग्नसमारंभ आहेत, शेतकऱ्यांचे काम सुरू आहे. पण देशाच्या सीमेवर कोणत्याही परिस्थितीत जवान उभा असतो. मतदारांमध्येही ही जागृती असली पाहिजे. आपल्या देशाचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी मतदान करा. लोकतंत्रासाठी पुन्हा आग्रह करतो मोठ्या प्रमाणात मतदान करा,” ‘निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते कपडे फाडणार’, मत वाया घालवू नकाअसे पंतप्रधान मोदी म्हणाले.
इंडिया आघाडीचे लोक भ्रष्टाचार लपविण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांच्यामध्ये निवडणूक लढण्याची हिंमत नाही. काँग्रेसने आधीच पराभव मान्य केला आहे. इंडिया आघाडीचे 25 टक्के उमेदवार असे आहेत की जे एकामेकांच्या विरुद्ध लढत आहेत. इंडिया आघाडीला धडा शिकवणे गरजेचे आहे. एव्हढा मोठा देश कोणाच्या हातात द्यायचा, हे कोणी सांगायला तयार नाहीत,असा खोचक टोलाही पंप्रधान मोदींनी यावेळी लगावला.
निवडणुकांपूर्वीच पराभव होईल याची भीती बाळगणाऱ्या विरोधीपक्षाच्या कार्यकर्त्यांना आज न उद्या संधी मिळेल. निराश होऊ नका. असे सांगत मोदी यांनी विरोधकांना आशेचा किरण दाखवला आहे. तसेच त्यांनी सर्वांना रामराम करत मोदींनी नांदेडकरांना 26 एप्रिलची तयारी झाली ना? असा प्रश्न विचारला. तसेच लोकशाही ताकद वाढवण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदान कुणालाही करा पण वोटिंग अवश्य करा असे आवाहन मोदींनी मतदारांना केले. वायनाडमध्ये मतदान झाल्यानंतर राहुल गांधींना दुसरा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागेल. असेही मोदी म्हणाले.
