महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमधील तापमान प्रचंड वाढले आहे. ४० अंश सेल्सियसच्या वर गेलेल्या तापमानात अंगाची लाहीलाही होत आहे. परंतु राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही शहरांमधील तापमान४५°c वर गेले आहे. यामुळे उष्मघाताचा धोका निर्माण झाला आहे. जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५°c वर गेला आहे. यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात २५ मेपासून 3 जूनपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जमाबंदीचे आदेश काढले आहेत. उष्णतेच्या लाट्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा आरोग्य विभागाने परिपत्रक जारी केले आहे.
गेल्या काही दिवसापासून जळगावातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. सकाळपासून तापमानाचा पारा ४० अंशावर जात आहे. दुपारनंतर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येते. उष्णतेच्या झळा रात्रीपर्यंत कायम असतात. आगामी आणखी काही दिवस तीव्र उष्णता कायम राहणार असून वाढत्या तापमानाचा पारा लक्षात घेता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विशेष आदेश पारित केले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात आज दि. २५ मे ते ३ जूनपर्यंत पावेतो फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ चे आदेश लागू करण्यात येत आहे. खालील प्रमाणे आदेशीत करण्यात येत आहे.
रोजगार हमीसह वेगवेगळ्या प्रकल्पाची कामे असल्यास मजुरांना सोबत घेऊन कडक उन्हात काम न करण्याच्या वेगवेगळ्या शासकीय विभागांना सूचना दिल्या आहेत. खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी १० वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चालवावे. पर्यायी व्यवस्था करावी, असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.कामाच्या ठिकाणी कामगारांना पुरेशे शेड तयार करणे, कुलर किंवा इतर साधने पुरवण्याची जबाबदारी संबंधित प्रतिष्ठान, कंपनी मालकांची राहणार आहे.दहा वर्षाखालील बालकांनी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बाहेर खेळू नये पालकांनी काळजी घ्यावी.दैनंदिन काम असल्यास रुमाल टोपी अशी आवश्यक खबरदारी घेऊन बाहेर पडावे. मुबलक पाणी प्यावे.उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तातडीने शासनाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून उपचार करून घ्यावे.
व्याघ्र प्रकल्पामध्ये प्राण्यांसाठी टाक्या
गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये प्राण्यांना सुद्धा उन्हाच्या त्रासापासून विसावा घेण्यासाठी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी छोट्या टाकी हौद बनवल्या आहेत. त्या टाकीमधून प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होत असते. या हौदामधून थंडगार पाणी मिळत आहे. तसेच वर्ध्याचे तापमान ४४.२ अंशांवर पोहोचले आहे. तापमानामुळे दुपारच्या सुमारास वर्दळ कमी होत आहे.विदर्भातील उष्णतेच्या लाटेचा अमरावतीमधील बाजारपेठेलाही फटका बसला आहे. अमरावतीमधील तापमान ४४ अंशावर गेले होते. दुपारी बारा वाजताच अमरावतीच्या मुख्य बाजारपेठेमधील ग्राहकांची गर्दी ओसरली.
