विशेष प्रतिनिधी
धाराशिव : राज्यात आजघडीला कार्यकर्त्यांना सांभाळणारा नेता म्हटलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर येते. फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे बघूनच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मतदान झाले असा दावा भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केले. (MLA Suresh Dhas claims vote for NCP, Shiv Sena just by looking at Fadnavis’ face)
धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. धस म्हणाले,भाजपच्या आज १३४ जागा आहेत. २२५ आमदारांचे बहुमत आहे. कारण काय, तर हा तमाम महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे बघतो. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून राष्ट्रवादी-शिवसेनेला मतदान झाले. देवेंद्र फडणवीस ईमानदार आहेत. त्यांच्याकडेच महाराष्ट्र दिला पाहिजे या प्रमुख भावनेतून लोकांनी आमच्याबरोबर घड्याळही निवडून दिले. आमच्याबरोबर बाणही हाणला. अजिबात मागे पुढे बघितलं नाही. घड्याळाला आमच्या लोकांनी मतदान केलं. नाही तर भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘घड्याळा’ला कधी मतं दिली असती का? एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाणालाही केले.बाणाची आणि आमची खूप जुनी मैत्री आहे. त्यामुळे आमच्या लोकांनी नेहमीप्रमाणे ‘बाणा’ला मतदान केले.
गोपीनाथ मुंडे यांच्या सभेचा किस्सा सांगताना धस म्हणाले, गोपीनाथ मुंडेंची सभा होती. सभेला व्यासपीठावर १३ लोक होते आणि समोर १२ लोक बसलेले होते. गोपीनाथराव म्हणाले, व्यासपीठावरील एकजण खाली जाऊन बसा. म्हणजे ते १३ होतील आणि आपण १२ होऊ. त्या १३ लोकांसमोर गोपीनाथरावांनी असं भाषण केलं, जसं काय समोर १३००० लोक बसले आहेत.
आमदार धस यांनी या कार्यक्रमात सत्कार नाकारला. जोपर्यंत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही, तोवर सत्कार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी आयोजकांकडे मांडली. त्यांच्या या भूमिकेनंतर मंचावरील इतर मान्यवरांनीही सत्कार स्वीकारला नाही.
